लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईकर सततच्या उष्ण आणि दमट वातावरणाने त्रासले आहेत. मात्र, शहरात लवकर येणाऱ्या समुद्री वाऱ्यांमुळे तापमानापासून दिलासा मिळणार आहे. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईकरांना दमट व उष्ण वातावरणापासून दिलासा मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईतील कमाल तापमान सध्या ३१-३३ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. जे मागील काही दिवसांच्या तुलनेत कमी आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३४.३ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
वाढलेल्या आर्द्रतेमुळे वातावरणात उष्मा अधिक जाणवत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा उष्मा सहन करावा लागत आहे. मात्र, आता एप्रिल अखेरपर्यंत उष्ण व दमट वातावरणापासून दिलासा मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबईत समुद्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांचा प्रभाव असतो. समुद्र जवळ असल्यामुळे हवेत पाण्याचे बाष्प जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हवामान ‘दमट’ वाटते. म्हणजेच शरीरातून घाम येतो पण तो वाफ होऊन जात नाही. त्यामुळे उष्ण व दमट वातावरणाची दाहकता अधिक जाणवते.
आरोग्यावर होणारे परिणाम
- या वातावरणाचा थेट परिणाम शरीरावर होतो. उष्माघात, डोकेदुखी, त्वचेच्या समस्या, थकवा आणि पाण्याच्या कमतरतेचे त्रास वाढतात.
- तापमान खूप वाढल्यास शरीराचं तापमान नियंत्रित न राहता अचानक चक्कर, उलट्या येणे
- जास्त घाम येतो पण भरपूर पाणी न प्याल्यास शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे थकवा जाणवतो
- दमट हवेमुळे त्वचेला पुरेशी हवा लागत नाही, परिणामी घामोळ्या, फंगल इंफेक्शन, खाज येणे, लालसरपणा दिसू शकतो.
पावसाचा अंदाज कुठे
राज्यात अनेक भागात तापमानाने ४० अंश पार केलेले असतानाच काही भागात पावसाचा ही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामध्ये मराठवाड्यातील परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी उष्णतेच्या लाटेचा उद्या इशारा देण्यात आला आहे. तर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भातील अनेक भागात शुक्रवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. अकोला जिल्ह्यात शुक्रवारपासून तीन दिवस, अमरावती, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात शनिवार ते सोमवार काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
ब्रम्हपुरी मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद
सलग दुसऱ्या दिवशी ब्रम्हपुरी मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. येथील तापमान ४५.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. त्याखालोखाल अकोला ४५.२ अंश सेल्सिअस, अमरावती ४४.२ अंश सेल्सिअस, चंद्रपूर ४५ अंश सेल्सिअस, नागपूर ४४.४ अंश सेल्सिअस, यवतमाळ ४४.४ अंश सेल्सिअस, पुणे ४० अंश सेल्सिअस, लोहगाव ४३.२ अंश सेल्सिअस आणि जळगाव येथे ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.