मुंबई : मुंबई – गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांना गती देण्यात आली आहे. माणगाव व इंदापूर बाह्यवळणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. माणगाव व इंदापूर बाह्यवळण वगळता उर्वरित मुंबई -गोवा महामार्गाचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण करू, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधान परिषदेत दिली.
निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे आदींनी या संदर्भातील प्रश्न विचारला होता. माणगाव बाह्यवळणावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम नव्या एजन्सीकडून सुरू आहे. रेल्वे उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू आहे. माणगाव व इंदापूर बाह्यवळण मार्गासह तीन रेल्वे उड्डाणपूल आणि दोन मोठ्या पुलांचा समावेश प्रकल्पात आहे. ही कामे जुलै २०२५ मध्ये सुरू करण्यात आली असून, जुलै २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. पहिल्या ठेकेदार काम गतीने करत नसल्यामुळे त्याच्याकडून ते काम काढून घेऊन नव्या एजन्सीला देण्यात आले आहे. कोकणातील गणेशोत्सव काळातील वाहतूक कोंडी लक्षात घेता माणगाव – महाड मार्गावरील ताम्हिणी घाटाचा बाह्यवळण मार्ग पावसाळ्यापूर्वी, म्हणजे मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मानस आहे. त्यामुळे माणगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे मंत्री भोसले यांनी सांगितले.
चिपळूण येथील पूल मे २०२६ पर्यंत पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असून, मुख्य काम पूर्णत्वास आले आहे. तसेच संगमेश्वर येथील हातखंबा उड्डाणपुलाचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. एकूण माणगाव बाह्यवळणाचे काम वगळता मुंबई – गोवा महामार्गाचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असेही मंत्री भोसले म्हणाले.
गांधार पाले लेण्याजवळील सुसज्ज विश्रांतीस्थळ
गांधार पाले लेण्याजवळील विश्रांती स्थळावर वाहनतळ, स्वच्छतागृह, हॉटेलची सोय करण्यात आली आहे. ठेकेदाराकडून ते सरकारकडे हस्तांतरीत होण्यापूर्वीच तिथे मद्यपींकडून तोडफोडी झाल्याचे दिसून आले. या बाबत डिसेंबर २०२५ मध्ये पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वी तेथे एकच सुरक्षा रक्षक होता, आता चार सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. तसेच सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. भविष्यातील सुरक्षेच्या दृष्टीने विश्रांती स्थळावर सुसज्ज असेल. आवश्यक सुधारणाही केल्या जातील, असे मंत्री भोसले यांनी सांगितले.
