शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि आमदार नितेश राणे यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. कणकवली येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. दरम्यान मंगळवारी नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी पार पडली. शुक्रवारी पुढील सुनावणी होणार असून तोपर्यंत नितेश राणे यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही अशी हमी राज्य सरकारने यावेळी न्यायालयात दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार असून तोपर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई करणार नसल्याची हमी राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. मात्र नितेश हेच या प्राणघातक हल्ल्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा आरोप असून हा दावा सिद्ध करणारे तपशीलवार प्रतिज्ञापत्र सादर करु अशी माहिती दिली.

“बाबा मला वाचवा म्हणत नितेश राणे लपून बसलेत”, शिवसेना आमदाराचा टोला, म्हणाले “नारायण राणे वाघ असल्यासारखे…”

उच्च न्यायालयाने यावेळी सत्र न्यायालयाच्या सुनावणीवेळी अंतरिम संरक्षण दिले होते का? अशी विचारणा केली. त्यावर नितेश राणे यांचे वकील नितीश प्रधान यांनी त्यावर दररोज सुनावणी होत होती. परंतु नितेश हे आमदार आहेत त्यामुळे याचिकेवरील सुनावणी सुरू असेपर्यंत त्यांना कठोर कारवाईपासून संरक्षण मिळायला हवे. त्यांच्यावर अपमानास्पद कारवाई करण्यात येत आहे असं सांगण्यात आलं.

तर नितेश हेच या हल्ल्यामागील मुख्य सूत्राधार असून आमचा हा दावा सिद्ध करणारे तपशीलवार प्रतिज्ञापत्र आम्ही सादर करू इच्छितो, असं विशेष सरकारी वकील सुदीप पासबोला यांनी न्यायालयाला सांगितलं. न्यायालयाने शुक्रवारी अडीच वाजता प्रकरणाची सुनावणी ठेवत सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास परवानगी दिली. दरम्यान, पुढील सुनावणीपर्यंत नितेश यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याची तोंडी हमी पासबोला यांनी न्यायालयाला दिली आहे.

आदित्य यांची नक्कल केल्यानेच खोटय़ा प्रकरणात गोवले ; नितेश राणे यांचा दावा

विधिमंडळाबाहेर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्याने आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्याच्या हेतूने आपल्याला लक्ष्य केले जात आहे. तसेच खोटय़ा प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा दावा नितेश यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या याचिकेत केला आहे. अ‍ॅड. संग्राम देसाई यांच्यामार्फत नितेश यांनी ही याचिका केली.

तक्रारदाराचे नितेश यांच्यासोबत शत्रुत्व असल्याचा प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) कोणताही उल्लेख नाही, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान, नितेश हेच परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यामागे असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. भीती निर्माण करण्याच्या हेतूने हा हल्ला घडवून आणण्यात आल्याचा दावा पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात नितेश यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करताना केला होता. अन्य आरोपींसोबतची नितेश यांची छायाचित्रेही पोलिसांनी सत्र न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली होती. अटक आरोपींची पृष्टी करण्याच्या दृष्टीने नितेश यांचा या आर्थिक किंवा राजकीय गुन्ह्यातील सहभाग शोधण्यासाठी त्यांच्या कोठडीची आवश्यकता असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन आणि पोलिसांचे म्हणणे मान्य करत सत्र न्यायालयाने नितेश यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai high court bjp nitesh rane shivsena santosh parab attack sgy
First published on: 04-01-2022 at 11:40 IST