मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत ५०० कामांचे भूमिपूजन मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये विकासात्मक बदल करण्याचा संकल्प राज्य सरकारने सोडला असून, रखडलेले प्रकल्प पूर्ण करून आंतरराष्ट्रीय पातळीवरील शहराची ओळख अधिक ठळक करण्यात येईल. प्रत्येक काम दर्जेदार आणि पारदर्शकपणे करण्यात येईल. पुढील दोन वर्षांमध्ये मुंबई खड्डेमुक्त होईल. तसेच मुंबईकरांच्या हिताला प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबई महापालिकेतर्फे मुंबईत विविध ठिकाणी राबिवण्यात येणाऱ्या सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत ५०० कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी गेट वे ऑफ इंडिया येथे करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास, पर्यटनमंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार आशीष शेलार, मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, आशीष शर्मा आदी उपस्थित होते. महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून ते किमान ३० वर्षे टिकतील. यावर्षी ५०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.