करोना आणि लॉकडाउननंतर राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पावलं टाकली जात आहे. राज्य सरकारने अनेक गोष्टी सुरू केल्या असल्या, तरी मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा अद्याप सर्वांसाठी सुरू करण्यात आलेली नाही. ही बाब निर्दशनास आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्राकडे विनंती करावी, अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली. मार्च महिन्यापासून मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. लोकल सेवा सुरू नसल्याने नागरिकांचे हाल होत असून, सगळ्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. याच मागणीसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. याबद्दल त्यांनी ट्विट करून माहिती दिली. "लोकलअभावी सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होऊन आर्थिक भुर्दंडही बसतोय. मुंबईत एपीएमसीमध्ये गेलो असता, माथाडी कामगारांनीही ही व्यथा मांडली. म्हणून सर्वांसाठीच लोकल सुरू करण्याच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांमार्फत केंद्राकडं पाठपुरावा करण्याची विनंती परिवहनमंत्री अनिल परब साहेबांना केली," असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. लोकलअभावी सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होऊन आर्थिक भुर्दंडही बसतोय. मुंबईत #APMC मध्ये गेलो असता माथाडी कामगारांनीही ही व्यथा मांडली. म्हणून सर्वांसाठीच लोकल सुरू करण्याच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांमार्फत केंद्राकडं पाठपुरावा करण्याची विनंती परिवहनमंत्री @advanilparab साहेबांना केली. pic.twitter.com/R4OHpWWCLl — Rohit Pawar (@RRPSpeaks) January 12, 2021 मंगळवार उलटला तरी निर्णय नाहीच? मुंबईतील उपनगरी (लोकल) रेल्वेसेवा सर्वांसाठी सुरू करण्याबाबतचा निर्णय येत्या मंगळवापर्यंत घेण्यात येईल, असं राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात सांगितले होतं. मात्र, मंगळवार लोटला तरी सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे लोकल नक्की कधी सुरू होणार, हा प्रश्न कायम आहे.