मुंबई : मध्य रेल्वेवरील ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी लोकलचा मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने माटुंगा कारखान्यात लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे.
मध्य रेल्वेवरील प्रत्येक लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. लोकलमध्ये प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी असे डब्याचे प्रकार आहेत. तर, महिला, दिव्यांग आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र डबे आहेत.

गरोदर स्त्रियांना आणि ज्येष्ठ नागरिकांना लोकलच्या डब्यात काही आसने राखीव आहेत. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना गर्दीतून प्रवास करणे कठीण होते. लोकलमधील गर्दीचा विचार करता ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या राखीव आसनापर्यंत पोहोचणे अशक्य होते. त्यामुळे मध्य रेल्वेने लोकलच्या माल डब्यात बदल करून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा तयार केला आहे. त्यामुळे पहिला लोकल रेक तयार झाला असून येत्या काळात मध्य रेल्वेवरील सर्व रेकमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मध्य रेल्वे काय म्हणते

रेल्वे मंडळाच्या निर्देशानुसार, माटुंगा कारखान्यातील पथकाने, लोकलच्या मालडब्याचे रूपांतर करून, ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी स्वतंत्र डबा तयार केला आहे. या डब्यामुळे लोकलमध्ये चढताना, उतरताना ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी कमी होतील आणि आरामदायी आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन डब्याचे वैशिष्ट्य

  • वाढीव आसन व्यवस्था – १३ प्रवाशांना बसता येईल, एवढी आसने.
  • प्रवाशांची सुरक्षितता वाढविण्यासाठी दरवाजाच्या पायदानाखाली आपत्कालीन शिडी बसवली आहे.
  • मालडब्याच्या दरवाज्याजवळ खांब नव्हता. परंतु, डब्यात बदल करताना दोन्ही दरवाज्याजवळ खांब लावण्यात आला आहे.
  • लोकल डब्यात आकर्षक देखावे लावण्यात आले आहेत.

न्यायालयात दाखल झाली होती याचिका

मुंबई उपनगरीय रेल्वेतून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, दिव्यांग प्रवाशांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केली होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करून दिला जाईल, असे रेल्वे प्रशासनाने न्यायलयाला आश्वासित केले होते. तसेच लवकरात लवकर कार्यादेश करण्याचे न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले होते. त्यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने हे काम करण्यास सुरुवात केली. त्यामागोमाग मध्य रेल्वेने सुरुवात केली आहे.