मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियमबद्ध करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक महत्त्वाच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित नियमांनुसार महिला राखीव डब्यात घुसखोरी करणाऱ्या पुरुषांना आता २,५०० रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कलम १६२ अन्वये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात किंवा अन्य जागेत पुरुष प्रवाशाने प्रवेश केल्यास ५०० रुपयांपर्यंत दंड, जागा रिकामी करणे आणि तिकीट जप्त करणे अशी तरतूद होती. मात्र, यात सुधारणा करून २,५०० रुपयांपर्यंत दंड आणि अन्य कारवाई अशी तरतूद करण्यात आली आहे.
दोषी व्यक्तीने दंड न भरल्यास संबंधिताला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशा प्रवाशाला न्यायालयाकडून ५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. या कलमांतर्गत तृतीयपंथी व्यक्तीविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाणार नाही. अनधिकृत प्रवास, आरक्षित डब्यांमध्ये बेकायदा प्रवेश, महिलांसाठी व दिव्यांगांसाठी असलेल्या राखीव जागांवर अतिक्रमण, तसेच तिकिटांशी संबंधित गैरप्रकारांवर कारवाई करण्यासाठी या सुधारणा करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, राखीव डबे व जागांचा आदर करावा, अनधिकृत प्रवेश, फेरीवाला व्यवसाय आणि धूम्रपान टाळण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. या सुधारणांमुळे रेल्वेतील शिस्त, सुरक्षा आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे सांगण्यात आले.
सुधारित तरतुदीनुसार नवे नियम
– आरक्षित डब्यात अनधिकृत प्रवेश केल्यास २ हजार रुपयांपर्यंत दंड, तर अधिकृत प्रवाशाला प्रवेश करण्यास अडथळा आणल्यास १ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. दंड भरण्यास नकार दिल्यास प्रकरण न्यायालयात जाईल आणि न्यायालयाकडून ३ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल.
– विनातिकीट प्रवाशांना भाडे आणि अतिरिक्त शुल्क किमान ५०० रुपये भरावे लागत आहेत. रक्कम न भरल्यास न्यायालय ६ महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा सुनावू शकते.
– अधिकृत अंतरापेक्षा पुढे प्रवास केल्यास भाड्यातील तफावत आणि किमान ५०० रुपयांचे अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. तिकिटांचे अनधिकृत हस्तांतरण केल्यास तिकीट जप्त करून भाडे व अतिरिक्त शुल्क वसूल केले जाईल. रक्कम न भरल्यास न्यायालय ६ महिन्यांपर्यंत कारावास किंवा २ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते.
