मुंबईः भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षासंदर्भात खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या समाज माध्यमांवरील सुमारे पाच हजार पोस्ट्स हटवण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागातील अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. समाज माध्यमांवरील लष्कराच्या हालचाली, रणनीती आणि शेजारील देशांकडून संभाव्य कारवाईबाबत अफवा पसरवल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबरने खोटी माहिती आणि अफवा पसवणाऱ्यांना इशारा दिला आहे. तसेच अशा माहितीवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर महाराष्ट्र सायबर विभाग समाज माध्यमांवर प्रक्षोभक, अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती पसरवणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेऊन आहे. त्यात समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात खोटी माहिती पसरवली जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर समाजमाध्यमांवरून सुमारे पाच हजार पोस्ट हटवण्यात आल्या.

याबाबत महाराष्ट्र सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सीमेवरील तणावाची स्थिती, नागरिकांसाठी सीमावर्ती भागातील घटनांविषयीची अचूक आणि वेळेवर माहिती फार महत्त्वाची ठरते. मात्र महत्त्वाच्या माहितीच्या प्रसाराच्या दरम्यान अनेक फसव्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर पसरविल्या जात आहेत. ही चुकीची माहिती सार्वजनिक भ्रम वाढवते आणि समाजात गोंधळ निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. या फसव्या माहितीचा मोठा भाग सैन्य हालचाली, रणनीतिक ऑपरेशन्स किंवा शेजारील देशांच्या प्रतिउत्तरात्मक कृतींशी संबंधित आहे. अशा अप्रमाणित आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीस राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो आणि तणाव वाढण्यास हातभार लागू शकतो.

असामाजिक घटक परिस्थितीच्या संवेदनशीलतेचा फायदा घेत असून, हे फसवे वृत्त तयार करून प्रसारित करण्याचा हेतू अनुयायी मिळवणे, घबराट पसरवणे किंवा जनतेची धारणा प्रभावित करणे हा आहे, अशी चिंता यावेळी महाराष्ट्र सायबर विभागाने व्यक्त केली आहे. या घटनांची नोंद घेत, महाराष्ट्र सायबर विभागाने अशा चुकीच्या माहितीच्या प्रसारास थांबवण्यासाठी अनेक नोटिसा जारी केल्या आहेत. तसेच समाज माध्यमांवरील व कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवरून अशी माहिती काढून टाकण्यात आली आहे.

खोटी माहिती जाणूनबुजून किंवा अनवधानाने पसरवणे हे संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा आहे. महाराष्ट्र सायबर विभाग नागरिकांना माहितीचा वापर आणि शेअर करताना संयम आणि सखोल विचार करण्याचा सल्ला देतो, विशेषतः राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांशी संबंधित बाबतीत भारत सरकार अधिकृत संवाद माध्यमे आणि प्रमाणित प्लॅटफॉर्मचा वापर करून राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षण विषयक निवेदने, अद्यतने आणि प्रेस विज्ञप्ती जारी करते. नागरिकांनी या अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवावा आणि अप्रमाणित संदेश, चित्रफिती किंवा प्रतिमा पुढे पाठविणे किंवा त्यांचे समर्थन करणे टाळावे, त्यामुळे सामाजिक संभ्रम किंवा चुकीच्या माहितीचा प्रसार होण्याची शक्यता असते. सर्व नागरिकांना जबाबदारीने वागावे, अधिकृत स्त्रोतांकडून सत्यता तपासावी आणि कोणतीही संशयास्पद किंवा दिशाभूल करणारी सामग्री आदींबाबत त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन विभागाने केले आहे.

भारत-पाकिस्तानी हॅकर्सकडून हल्ले प्रतिहल्ले

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात १० लाखांहून अधिक हल्ले झाले असून त्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आले आहे. याबाबत सायबर विभागाकडून सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. “इकोज ऑफ पहलगाम” या सविस्तर अहवालानुसार, २३ एप्रिलपासून जवळपास १० लाख सायबर हल्ले नोंदवले गेले आहेत. एखाद्या हॅकरकडून हे हल्ले झालेले नसून या मागे एक गट असल्याचा संशय आहे. दहशतवाद्यांनी राबवलेल्या मोहिमेचा हा भाग असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हे फक्त हल्ले नसून संघटीत सायबर युद्धासारखी स्थिती असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हे हल्ले पाकिस्तान, मध्य पूर्वेतील देश, मोरोक्को आणि इंडोनेशिया या देशांतून होत आहेत. या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या अनेक हॅकर गटांनी स्वतःला विशेष नाव दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यातील ‘टीम इन्सेन पीके’ हा पाकिस्तानस्थित गट सर्वाधिक सक्रिय आहे. त्याच्याकडून सर्वाधिक हल्ले होत असल्याचा संशय आहे. या गटाने भारतीय सैनिकी शिक्षण संस्थांवर, सैनिक कल्याण पोर्टल्सवर आणि अनेक सैनिकी शाळांच्या संकेस्थळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. राजस्थानमधील शिक्षण संस्थेचे संकेतस्थळ हॅक करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी हॅकर्सकडून करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून सायबर कमांडर हॅकर्स ग्रुपने पाकिस्तानातील १५०० संकेतस्थळ हॅक केली आहेत. “सायबर कमांडर” या नावाखाली हे प्रतिहल्ले केल्याचा दावा करण्यात येत असून, यात कराची, खैबर पख्तूनख्वा, मुलतान, पेशावर, फैसलाबाद, ॲबटाबाद येथील विद्यापीठे, वैद्यकीय डेटाबेस, ‘दस्तक’ या वाहन परवाना पोर्टल, फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू आणि विविध सरकारी ई-मेल सर्व्हर यांचा समावेश होता. पाकिस्तानमधील ३५ हून अधिक शैक्षणिक व सरकारी संस्थांचे मेल-सर्व्हरही हॅक करण्यात आले होते.