मुंबई : पावसाळा तोंडावर आला असून मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर मुंबईत आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुंबईत अतिवृष्टीच्या वेळी एखादी दुर्घटना घडल्यास त्याला तोंड देण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांना संपर्क साधता यावा, तसेच धोक्याची सूचना देण्यासाठीची यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर २४ प्रशासकीय विभागांमध्ये प्रथमच मनुष्यबळासह विभागीय नियंत्रण कक्ष सज्ज करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होते. या काळात झाडे पडणे, इमारतीची पडझड, पाणी तुंबणे अशा घटना घडतात. एका तासात जास्त पाऊस पडल्यास महापूर येतो, कधी नाल्यात कोणी वाहून जातात, कुठे दरड कोसळते आदी दुर्घटना घडतात. अशावेळी मुंबईतील सर्व प्राधिकारणांशी समन्वय साधून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे काम महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून करण्यात येते. त्यादृष्टीने मुंबई महानगरपलिकेने तयारी केली आहे.

हेही वाचा >>>शरद पवारांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबईत पूराची सूचना देणारी अद्ययावत यंत्रणा

यंदा पावसाळ्यात नागरिकांच्या सुविधेसाठी ‘आयफ्लोज’ ही अत्याधुनिक प्रणाली उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि राष्ट्रीय समुद्रीतट संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पूरप्रवण क्षेत्राची आगाऊ सूचना देणारी प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासोबतच नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन कक्षासोबत संपर्क साधण्यासाठीचे मदत क्रमांक, आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरता निवारा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक आणि मोबाइल ॲप यांसारख्या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच २४ प्रशासकीय कार्यालयांमध्ये ‘विभागीय नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे.

महानगरपालिकेची २४ प्रशासकीय विभाग कार्यालये, सहा मोठी रुग्णालये व २८ बाह्य यंत्रणांना जोडण्यासाठी ५८ हॉट लाईन्सची सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांमार्फत मुंबईत बसविण्यात आलेल्या ५,३६१ सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील थेट प्रक्षेपण पहाण्याकरिता आपत्कालीन कक्षात व्हीडीओ वॉलची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच आपत्ती प्रसंगी वाहतूक व्यवस्था कोलमडल्यास रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी, तसेच आपत्तीमुळे बेघर झालेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>जीवे मारण्याची धमकी आल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले…

अशी तयारी

नागरिकांसाठी मदतक्रमांक

• हेल्पलाईन क्रमांक १९१६ : १९१६ क्रमांकाच्या ३० लाईन्स हंटींग सुविधेसह तत्पर

• थेट दूरध्वनी क्रमांक – २२६९४७२५ / २७, २२७०४४०३ फॅक्स- २२६९४७१९

पाच हजार सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर

मुंबई पोलिसांमार्फत मुंबईत बसविण्यात आलेल्या ५,३६१ सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागात व्हिडीओ वॉलची सुविधा असून त्यावर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्राप्त होणाऱ्या थेट चलत छायाचित्रणाचे नियमित अवलोकन केले जाते.

विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे नियमित अवलोकन करता यावे यासाठी ३ दूरचित्रवाणी संच, नियंत्रण कक्षातील संदेशवहन यंत्रणा कोलमडल्यास त्वरित संदेश वहनासाठी हॅम रेडीओ तयार ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२३: विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यास सात दिवसांची मुदतवाढ

मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात काही समस्या उद््भवल्यास समन्वय कार्य अबाधितपणे सुरू राहावे यासाठी परळ येथील साईबाबा मार्गावरील बेस्ट वसाहतीच्या शेजारील शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत पर्यायी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. हा नियंत्रण कक्ष संपूर्ण वर्षभर व दिवसाचे २४ तास कार्यरत आहे. तसेच येथे आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. बॅकअप नियंत्रण कक्ष मुख्य नियंत्रण कक्षाप्रमाणेच हॉट लाईन्स, बिनतारी यंत्रणा, हॅम रेडीओ यांनी जोडलेला आहे. तसेच हेल्पलाईन क्रमांक १९१६ यावर येणाऱ्या तक्रारी नोंदविण्याची पर्यायी व्यवस्था आहे.

मान्सून कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर झाड किंवा झाडांच्या फांद्या पडण्याच्या तक्रारी प्राप्त होतात. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यासाठी विभाग कार्यालयात कनिष्ठ वृक्ष अवेक्षकांची तिन्ही सत्रांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे २४ तास याबाबत समन्वय करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर सर्व प्रशासकीय विभागांमध्ये पडलेली झाडे कापणे व उचलणे याकरिता कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.

आपत्ती प्रसंगी तात्पुरता निवाराः वाहतूक व्यवस्था कोलमडल्यास विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी, तसेच आपत्तीमुळे बेघर झालेल्या नागरिकांना तात्पुरता आश्रय मिळावा म्हणून महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागातील पाच शाळा आणिबाणीत तात्पुरत्या स्वरुपावर एकत्रित जमण्याची ठिकाणे म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत शहर व उपनगरात ४७७ ठिकाणी पाण्याचा उपसा करणारे उदंचन संच बसविण्यात आले आहेत.

मान्सून कालावधीत आकस्मिक खर्चाकरिता १ लाख रुपयांचे अग्रधन प्रत्येक विभागास उपलब्ध करण्यात आले आहे.

मान्सुन कालावधीत महापालिकेतर्फे घटनास्थळी जाऊन काम करणाऱ्यांची ओळख पटावी यासाठी सर्व संबंधित कामगारांना महापालिकेचे नाव असलेली रिफ्लेक्टीव्ह जॅकेट्स उपलब्ध करण्यात आली आहेत.

समुद्रावरील सुरक्षितता

१. मान्सुन कालावधीत समुद्रास येणाऱ्या मोठ्या भरतीच्या दिवशी (४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा) तसेच शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशी नागरिक समुद्रात बुडण्यासारख्या घटना घडू नयेत, याकरिता ६ समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षकांसह अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान, पोलीस पेट्रोलिंग वाहने तैनात असणार आहेत. समुद्रावर धोक्याच्या सूचना देणारे सूचना फलक लावण्यात आले आहेत.

विविध सहकारी यंत्रणांची सज्ज

• पुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी पूर प्रतिसाद पथकामध्ये १२३ अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला कमानी, चेंबूर, मरोळ व बोरिवली या अग्निशमन केंद्रांवर तैनात करण्यात आले आहे.

•संभाव्य पूर परिस्थिती दरम्यान आवश्यक असणारी जीवसंरक्षक सामग्री वांद्रे, वांद्रे – कुर्ला संकुल, कुर्ला कमानी, चेंबूर मरोळ व बोरिवली येथील अग्निशमन केंद्रांवर तैनात ठेवण्यात आली आहे.

• भारतीय सैन्यातील थलसेनेचे ५ कॉलम आणिबाणी परिस्थिती उद््भद्भवल्यास त्वरित मदतीकरिता तत्पर ठेवण्यात आले आहेत.

• या तुकडयांकडे बोटी, ओबीएम व लाईफ जॅकेट्स उपलब्ध आहेत.

• कुलाबा, वरळी, मालाड, मानखुर्द आणि घाटकोपर येथे नौदलाची ५ पूर बचाव पथके तैनात आहेत.

• नौदलाचे १ पाणबुडी पथक कुलाबा येथे तर २ पथके उरण येथे तैनात आहेत.

• कुलाबा येथे चेतक व सी-किंग नावाचे हेलिकॉप्टर मदतीकरिता तत्पर आहे.

• आणिबाणी प्रसंगी शोध व बचाव कार्यासाठी एक स्वतंत्र जहाज तैनात आहे.

• कुलाबस्थित आयएनएस आंग्रे येथील नौदलाच्या सागरी सुरक्षा मुख्यालयात आपत्ती नियंत्रण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

• महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून मदतीचा संदेश जाताच नौदलामार्फत खालील सुविधा पुरविण्यात येतीलः-

• मुंबईकरिता पूर बचाव पथके

• पाणबुडे

• समुद्रातील शोध व बचाव कार्य

• जहाज व हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाधितांना सुरक्षित स्थळी हलविणे

• मदत साहित्याचे वितरण

• भारतीय तटरक्षक दलाची ४ पथके मान्सून कालावधीदरम्यान सज्ज ठेवण्यात आली आहेत. ही पथके कुलाबा, वरळी व मानखुर्द येथे तैनात आहेत.

• या पथकांकडे तरंगणारे तराफे, लाईफ जॅकेट्स, दोरांसह लाईफ बुआईज, प्रथमोपचार संच उपलब्ध असतील.

• तटरक्षक दलाचा निशुल्क हेल्पलाईन क्रमांक १९५४ आहे.

• भारतील तटरक्षक दलाचा वरळी येथील नियंत्रण कक्ष महापालिकेच्या मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी हॉटलाईनद्वारे जोडण्यात आलेला आहे.

• मुंबईत कोणत्याही प्रकारची आणिबाणी परिस्थिती उद्भवल्यास त्वरीत मदतकार्याकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकडया अंधेरी क्रीडा संकुल येथे तैनात आहेत. २०२३ च्या मान्सुनकरिता जास्त धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता असणाऱ्या एम/पश्चिम, एन आणि एस विभागांकरिता दोन जादा पथके ८ जून २०२३ पासून तैनात करण्यात आली आहेत.

नागरिकांना आवाहन

• नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावयाचा असल्यास त्यांनी खालील माध्यमांचा वापर करावा –

• १९१६ मदतसेवा क्रमांक

• संकेतस्थळ – dm.mcgm.gov.in

• मोबाईल ॲप – Disaster Management BMC

• इन्स्टाग्राम – my_bmc

• ट्वीटर हॅन्डल – @mybmc

•फेसबुक – myBmc

• यु ट्युब – MyBMCMyMumbai

• चॅटबॉट क्रमांक – ८९९९२२८९९९

•विभागीय नियंत्रण कक्ष (संपर्क क्रमांक सोबत जोडण्यात आले आहेत)

• मान्सून कालावधीत नागरिकांनी समुद्रकिनारी पाण्यात जाणे टाळावे.

• अतिमुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास साचलेल्या पाण्यातून जाणे टाळावे.

• मान्सून कालावधीत गडगडाट व वीजा चमकत असताना उघड्या परिसरात जाणे तसेच झाडाखाली उभे रहाणे टाळावे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation is ready for monsoon mumbai print news amy
First published on: 09-06-2023 at 20:13 IST