मुंबई : अमली पदार्थाच्या तस्करी विरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांचा स्वतंत्र विभाग असला तरी कारवाईच्या दिशेने बोंब होती. राज्यात राष्ट्रीय अमलीपदार्थ विरोधी विभाग (एनसीबी) सक्रिय झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कारवाईत अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एनसीबीला शह देण्यासाठी पोलिसांची कारवाई सुधारली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन वर्षांत मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईत २०८ गुन्हे दाखल केले असून या अंतर्गत २९८ आरोपींना अटक केली आहे. या काळात ३१ कोटी रुपये किमतीचा ३४१४ किलो मुद्देमाल जप्त केल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या माहितीमुळे स्पष्ट झाले आहे. ही आकडेवारी पाहता कारवाईत सातपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०१९ आणि २०२० च्या तुलनेत या वर्षी अंमली पदार्थ विरोधी कक्ष अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. २० ऑक्टोबर २०२१ पर्यंतची आकडेवारी उपलब्ध झाली असून त्यावर नजर टाकल्यास कारवाई सात पटीने वाढल्याचे स्पष्ट होते. २०१९ मध्ये २५.२९ कोटी रुपये किमतीचा ३९४.३५ किलो तर २०२० मध्ये २२,२४ कोटी रुपये किमतीचा ४२७.२७७, किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला. यंदाच्या वर्षांत २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत २५९२.९३ किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ८३.१९ कोटी इतकी आहे. एकीकडे एनसीबी सक्रिय झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत वाढ झाल्याचे दिसून येते. अंमली पदार्थ विरोधी कक्षाने २०१९ आणि २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये सर्वाधिक गुन्हे नोंदवले. २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत एकूण ९४ गुन्हे नोंदले गेले. त्यात १३७ जणांना अटक करण्यात आली. २०१९ मध्ये ७० गुन्ह्यत १०३ तर २०२० मध्ये फक्त ४४ गुन्ह्यत ५८ जणांना अटक करण्यात आली.