मुंबई : देशभरात धार्मिक मुद्यावरून वातवरण तापले असताना मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने या वर्षांत आतापर्यंत समाजमाध्यमांवरील १२ हजार ८०० प्रक्षोभक, आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या आहेत. पोलीस याबाबत सतर्क असून समाजमाध्यमांवरील प्रक्षोभक पोस्टवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.रामनवमीपासून देभभरात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. याप्रकरणी मुंबईतही गुन्हे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला, तर दुसरा गुन्हा मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. मानखुर्द येथील घटनेत ३० जणांना अटक केली आहे. यावर्षी जानेवारीत पाच हजार ७५४, फेब्रुवारीमध्ये चार हजार २५२ व मार्चमध्ये तीन हजार ९५८ व मार्चमध्ये दोन हजार नऊ प्रक्षोभक पोस्ट सापडल्या होत्या. एप्रिल १७ पर्यंत सुमारे १६ हजार आक्षेपार्ह पोस्ट सापडल्या असून त्यातील १२ हजार ८०० पोस्ट हटवण्यात आल्या आहेत. भोंग्याबाबत मार्गदर्शक सूचनांसाठी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांची महत्वाची बैठक होणार आहे.