Mumbai Rain Update: मुंबईत मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून गुरुवारी रात्रभर शहर आणि उपनगरात तुफान पाऊस झाला. त्यामुळे पहाटेपासूनच सखल भाग पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम काही भागातील वाहतुकीवर होताना दिसत आहे. दरम्यान, आजही हवामान विभागाकडून मुंबईला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून पुढील तीन तासात पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गरज असल्यास घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता तसेच रात्रीपासून शहर आणि उपनगरात पावसाची संततधार सुरु आहे. पश्चिम उपनगरात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून येत आहे. यात अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, बोरिवली, दहिसर आदी भागातही मुसळधार पावसाची नोंद होत आहे. तसेच मुसळधार पावसामुळे दादर परिसरातील काही भागात पाणी साचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. मुलुंड आणि वांद्रे – कुर्ला संकुल परिसरातही पावसाचा जोर आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी ८ ते शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत मुंबई शहरात सरासरी ११४ मिमी पावसाची नोंद झाली तर पूर्व उपनगरात १०२ मिमी आणि पश्चिम उपनगरात सरासरी १०९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा अंदाज

दरम्यान, हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला पुढील तीन तासांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टीसह राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत आहे. मुंबईसह उत्तर कोकणातही पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई, पालघर आणि ठाणे आदी भागांना पावसाने झोडपले असून काही भागात अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारपर्यंत या संपूर्ण प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून मुंबई आणि पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’ तर शनिवारी ठाण्याला अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.

कुठे किती पाऊस ?

गुरुवारी सकाळी ८ ते शुक्रवारी सकाळी ६ या वेळेत नोंदला गेलेला पाऊस

परिसरपावसाची नोंद (मिमी)
मलबार हिल१४६
फोर्ट परिसर१३९
अंधेरी१३६
वर्सोवा१२९
पवई१२४
मानखुर्द११८
भांडुप११६
मुलुंड११५