मुंबई : मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट ) दिला आहे. दिवसभर शहरात ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच दुपारनंतर काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज दुपारनंतर ढगाळ वातावरण राहणार असून काही भागांत जोरदार सरी कोसळू शकतात. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमीपर्यंत असण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईबरोबरच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे किमान तापमानात काहीशी घट झाली आहे. आज उत्तर महाराष्ट्रातही वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
कमाल तापमानात चढ उतार सुरू
मध्य प्रदेशापासून मराठवाडा, तेलंगण ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात असलेल्या पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. आज राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता आहे.
यलो अलर्ट म्हणजे काय?
यलो अलर्ट म्हणजे हवामानात बदलाची शक्यता असून, तो ‘सतर्कतेचा इशारा’ असतो. यात हवामानाचा परिणाम दैनंदिन जीवनावर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनेकडे लक्ष देत खबरदारी बाळगणे आवश्यक असते.
वादळी पाऊस गारपिटीची शक्यता (यलो अलर्ट)
धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक
वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट)
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली</p>
पावसाळी वातावरण कशामुळे?
अरबी समुद्रात दिड किमी. उंचीपर्यंत प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ताशी ४५ ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे हा वातावरणीय बदल झाला आहे.