Mumbai Rain Breaking News : मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही भागांत हलक्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरात दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. याचबरोबर राज्यातील इतर भागातही सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सकाळपासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. वरळी, वांद्रे, पवई, बोरिवली, अंधेरी आणि आसपासचा परिसर तसेच ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई परिसरातही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने आज सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला असून त्यात कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. संबंधित ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही भागांत हलक्या सरी पडू शकतात. शेतकरी आणि नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
वादळी पाऊस, गारपिटीची शक्यता (ऑरेंज अलर्ट)
जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड.
वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट)
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंदूरबार, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.
कमी दाबाचा पट्टा सक्रिय
दक्षिण तेलंगण आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून, रायलसीमा, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे देशातील उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दक्षिण अंदमानमध्ये मोसमी पाऊस लवकर
नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे यंदा आठ दिवस अगोदरच मोसमी पाऊस दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी २२ मे दरम्यान मोसमी पाऊस अंदमानात दाखल होतो, यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस मलेशिया, सिंगापूर, सुमात्रा बेटाचा उत्तरेकडील भाग ओलांडून भारताच्या अंदमान व निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील आग्नेय बंगालच्या उपसागरात तो १३ मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे.