करोनाच्या पहिल्या दोन लाटांचा मुंबईकरांना खूप मोठा फटका बसला. रुग्णसंख्या सध्या कमी असली तरी आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारकडून करोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, पुढचे काही महिने सणांचे असल्यानं काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात लोकांनी खबरदारी घेत बाप्पाला घरी आणलं आणि निरोप दिला. मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आवाज फाउंडेशनने १९ सप्टेंबर रोजी गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईने गेल्या १८ वर्षांमध्ये यावर्षी सर्वात शांत गणेश चतुर्थी साजरी केली आहे. आकडेवारीनुसार, सणाच्या शेवटच्या दिवशीही, शहरातील आवाजाची पातळी ९३.१ डेसिबल (डीबी) पर्यंत पोहोचली होती. जी पातळी २०२० मध्ये संपूर्ण उत्सवाच्या काळात १००.७ डीबीवर होती. आवाज फाऊंडेशनने जारी केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून येते की शहरात आतापर्यंतच्या सर्वाधिक आवाजाची नोंद २०१५ च्या चतुर्थी दरम्यान झाली होती. त्यावेळी आवाजाची पातळी १२३.७ डीबी होती. यानंतर २०१३ च्या चतुर्थीमध्ये ही पातळी १२३.२ डीबीवर होती. आवाज फाऊंडेशन प्रमुख सणांच्या दरम्यान शहरात आवाजाची पातळीची नोंद करत आहे. दरम्यान यावर्षी, नियमांचे उल्लंघन आणि आवाजाची पातळी तुलनेने कमी होती, असं समोर आलंय. आवाज फाउंडेशनने २०२० च्या तुलनेत आवाज कमी करण्यासाठी पोलिसांच्या व्यवस्थेबद्दल आणि गणेश मंडळांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. अहवालात कमी आवाजाला जबाबदार असलेल्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये लाउडस्पीकर नसणं, फटाके आणि इतर काही बाबींचा समावेश आहे. मानवी कान ७० डीबीपर्यंत ध्वनी सहन करू शकतो. मात्र, सणांच्या काळात लोक सर्वकाही विसरतात आणि आवाज वाढवण्यासाठी डीजे आणि इतर साधनांचा वापर करतात. २०१९च्या गणेश चतुर्थीच्या दिवशी १२१.३ डीबी आवाजाची नोंद करण्यात आली होती.