मुंबई : बारावीच्या परीक्षेत मुंबई विभागात ५६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. मात्र इंग्रजी भाषा व अर्थशास्त्र या विषयांत अनेक विद्यार्थ्यांची दांडी उडाली आहे. इंग्रजीमध्ये सर्वाधिक २० हजार ८१८ विद्यार्थी तर अर्थशास्त्रामध्ये १५ हजार ६१० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मराठीची गळचेपी करण्यात येत असल्याच्या आरोपावरून राज्यात वादंग निर्माण झाला असताना बारावीच्या परीक्षेमध्ये मुंबई विभागातून इंग्रजी भाषा या विषयात सर्वाधिक मुले अनुत्तीर्ण झाली आहेत. मुंबई विभागातून इंग्रजी भाषा हा विषय ३ लाख ३५ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी घेतला होता. त्यातील ३ लाख १५ हजार ११६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंग्रजी भाषेतून उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९३.८० टक्के इतके आहे. तर २० हजार ८१८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. एक हजार ८४८ विद्यार्थी इंग्रजी पेपरलाच बसलेले नाहीत. मुंबई विभागात इंग्रजी भाषेतून सर्वाधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र हा विषयही अवघड गेला आहे. अर्थशास्त्र विषयात २ लाख ६ हजार ९९० विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९१ हजार ३८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याचे हे प्रमाण ९२.४६ टक्के इतके आहे. अर्थशास्त्रातून १५ हजार ६१० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.५६ विषयांचा निकाल १०० टक्के
राज्यात ३७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला असताना मुंबईत ५६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात मल्याळम, तामिळ, तेलुगू आणि जर्मन या चार भाषांबरोबरच संगीत विषयाशी संबंधित तीन विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्याचबरोबर ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, कम्प्युटर, अग्रीकल्चर, मेडिकल लॅबोरेटरी, रेडिओलॉजी आणि टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांशी संबंधित विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.