मुंबई : श्रीनगर येथे सलग दोन दिवस पाऊस होत असल्याने जम्मूला जाणारे रस्ते बंद झाले होते. सोबत लहान मुले असल्याने परतीच्या प्रवासात अडचण येऊ नये यासाठी आम्ही सोमवारी पहलगामला जाण्याचा निर्णय रद्द करत जम्मूच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. भारतातील स्वित्झर्लंड समजलेले जाणारे पहलगाम बघता येणार नसल्याची खंत मनामध्ये होती. मात्र मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून देवानेच आम्हाला वाचवले, या शब्दांत मुंबईचे अतुल कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जम्मू-काश्मीर फिरण्यासाठी फेब्रुवारीमध्येच नियोजन केले होते. पत्नी, मुलगा, पुतण्या आणि एक मित्र व त्याची पत्नी असे सहा जण होतो. सोनबर्ग व गुलबर्ग पाहिल्यानंतर सोमवारी श्रीनगरहून पहलगामला जाणार होतो. मात्र सलग दोन दिवस पाऊस पडत असल्याने जम्मूला जाणारा रस्ता बंद करण्यात आल्याचे कळले. सोमवार व मंगळवार हे दोन दिवस मुक्काम पहलगामला नियोजित होता.
पहलगाम म्हणजे भारतातील स्वित्झर्लंड असल्याने तिकडे जाण्याची फार इच्छा होती. मात्र पावासामुळे आम्हाला निराश मनाने आमचा निर्णय बदलावा लागला. त्यावेळी तेथील काही स्थानिकांकडून इतक्या लांब आला आहात तर पहलगामला जाऊन या, तेथील निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे, असे सांगण्यात आले. मात्र जम्मूकडे जाणारा महामार्ग बंद झाल्याने आणि सुट्टी मर्यादित असल्याने आम्ही परतण्याचा निर्णय घेतला.
या परतीच्या प्रवासात असतानाच पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याचे कळले आणि आमच्या सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकला. आमच्या नियोजनानुसार हल्ला झाला त्यावेळी आम्ही पहलगाममध्येच असणार होतो. त्यामुळे देवानेच आम्हाला वाचलवले, असे कदम म्हणाले.
परतीचा प्रवासही जीव मुठीत घेऊन
पहलगामला जाण्याचे रद्द झाल्याने आम्ही श्रीनगरहून जम्मूला जाण्यासाठी सोमवारी सकाळी निघालो. मात्र पावसामुळे या सहा तासांच्या रस्त्यांसाठी आम्हाला तब्बल १९ तास लागले. या प्रवासात एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे कड्यांवरून खाली पडणारे बर्फ यामुळे आम्ही संपूर्ण प्रवासामध्ये देवाचा धावा करत होतो. आमच्यासोबत दोन लहान मुले असल्याने अधिकच भीती वाटत होती, असे अतुल कदम यांनी सांगितले.
विमानाचे तिकीट ६० हजार रुपये
श्रीनगरमध्ये पडत असलेल्या पावासामुळे जम्मूला जाण्याऐवजी विमानाने थेट मुंबईला जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. मात्र जम्मू ते मुंबईपर्यंत एका व्यक्तीचे विमानाचे तिकिट हे ६० हजार रुपये इतके होते. हे तिकिट परवडणारे नसल्याने त्यांनी ट्रेनने दिल्लीपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला.
पहलगाम हॉटेल बुकींगचे पैसेही बुडाले
पहलगामला जाण्याचा निर्णय रद्द केल्याने हॉटेल व्यवस्थापकाशी संपर्क साधून पैसे परत मिळविण्याची विनंती केली. मात्र त्याने फेब्रुवारीमध्ये बुकींग केलेले असल्याने पैस परत देण्यास नकार दिला, असे कदम म्हणाले.