मुंबई : मुंबई विद्यापीठात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर स्तरावर रसायनशास्त्रात सह पदवीचे शिक्षण (एम.एस. इन केमिकल सायन्सेस – जॉइंट डिग्री) घेता येणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि अमेरिकेतील प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठ यांच्यात झालेल्या शैक्षणिक सामंजस्य कराराच्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ‘एम.एस. इन केमिकल सायन्सेस’ या सह पदवी अभ्यासक्रमासाठी दोन्ही विद्यापीठांमार्फत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाच्या दोन सत्राचे शिक्षण मुंबई विद्यापीठात, तर द्वितीय वर्षाच्या दोन सत्राचे शिक्षण सेंट लुईस विद्यापीठात मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण आणि इंटर्नशिपही करता येणार आहे. विशेष म्हणजे सह पदवी कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यास दोन्ही विद्यापीठाची पदवीही प्रदान करण्यात येणार आहे.

दरम्यान, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ‘एम.एस. इन डेटा एनालिटिक्स’ आणि ‘एम.एस. इन सायबर सिक्युरिटी’ या दोन अभ्यासक्रमांना प्रविष्ठ झालेले मुंबई विद्यापीठाचे १० विद्यार्थी सेंट लुईस विद्यापीठात तिसऱ्या सत्राच्या शिक्षणासाठी प्रवेशित होत आहेत. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षण शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहचर्य व विद्यार्थी सहाय्य केंद्रातर्फे सेंट लुईस विद्यापीठात द्वितीय वर्षाच्या दोन सत्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हिसा सुलभीकरण, तज्ज्ञांकडून सपुपदेशन, कागदपत्रांचे साक्षांकीकरण, शिष्यवृत्ती सहाय्य, वसतिगृह सहाय्य अशा अनुषंगिक बाबींसाठी सहाय्य केले जात आहे, याप्रमाणेच २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून ‘एम.एस. इन केमिकल सायन्सेस’ या सह पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच ‘विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय वातावरणात रसायनशास्त्रातील विविध विषयातील अध्ययनाच्या शाखा, संशोधन पद्धती, अद्ययावत प्रयोगशाळा आणि उपकरणांचा अभ्यास करता येईल. त्याचबरोबर या सहयोगाअंतर्गत दोन्ही विद्यापीठातील पायाभूत व अनुषंगिक सुविधा, कौशल्य आणि आधुनिक उपकरणे आणि संसाधनाच्या एकत्रित वापरामुळे अध्ययन व संशोधनातील संभाव्य परिणाम साध्य करता येऊ शकणार आहेत’, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.