मुस्लीम आरक्षणाचा विषय डावलून सरकारने जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप करत मुस्लीम आरक्षणासाठी टोलवाटोलवी करणाऱ्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या निषेधार्थ ३१ डिसेंबरला मुंब्रा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या आंदोलनानंतरही सरकारला जाग आली नाही, तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नागपूर येथे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले, मात्र मुस्लीम आरक्षणाला कात्री लावली. राज्याच्या महाधिवक्त्यांचा अभिप्राय घेऊन निर्णय देण्याचे जाहीर केल्याने राज्यातील मुस्लीम समाजात असंतोष पसरला आहे.
मराठा आरक्षणाप्रमाणे मुस्लीम आरक्षणासाठी सरकारने न्यायालयात जायला हवे होते, मात्र सरकार न्यायालयात गेले नाही. त्यामुळे सरकार जाती-धर्मात आग लावण्याचे काम करीत असून त्यांचा हिंदू राष्ट्र निर्मितीचा छुपा अजेंडा आहे, असा आरोपही आव्हाड यांनी या वेळी केला.