मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान वन्यजीवांसाठी बांधण्यात आलेल्या उन्नत मार्गाचा भाग कोसळला आणि नागपूर ते शेलू बाजार, वाशिम अशा २१० किमीच्या मार्गाचे लोकार्पण रद्द करण्यात आले. आता नव्याने या उन्नत मार्गाची बांधणी करण्यात येत असून हे काम पूर्ण होण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यादरम्यान नागपूर ते शिर्डी अशा सलग ५२० किमीच्या मार्गातील अपूर्ण कामे वेगाने पूर्ण करत एकाच वेळी हा ५२० किमीचा मार्ग वाहतुकीस खुला करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विचाराधीन आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर केवळ आठ तासांत पार करता यावे यासाठी ५५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग बांधण्यात येत आहे. हा प्रकल्प रखडला असून २०२१ मध्येच मार्ग वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. टप्प्याटप्प्याने मार्ग खुला न करता नागपूर ते शिर्डी अशा ५२० किमीचा मार्ग पुढील दोन ते तीन महिन्यांत खुला करण्याच्या दृष्टीने एमएसआरडीसीचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दुजोरा दिला आहे. मात्र यासंबंधीचा अंतिम निर्णय झाला नसून लवकरच निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता २१० किमीऐवजी ५२० किमीचा मार्ग पहिल्या टप्प्यात खुला होण्याची शक्यता आहे. ..खर्च कंत्राटदाराकडून समृद्धी मार्गाच्या पॅकेज १ मध्ये नागपूरपासून १५ किमी अंतरावर मेघा इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनीअिरग लिमिटेड या हैदराबादस्थित कंपनीकडून उन्नत मार्गाचे काम करण्यात येत होते. हे काम ३० मे रोजी पूर्ण होणार होते. सुपर स्ट्रक्चर आर्च पद्धतीने या मार्गाची बांधणी केली जात होती. या कामादरम्यान काही तरी चूक झाली आणि उन्नत मार्गाचा एक भाग कोसळला असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली. आर्च पद्धतीतील पूल, मार्ग दिसायला देखणे असतात. मात्र बांधकामाच्या मजबुतीविषयी प्रश्न आहे. त्यामुळे आता आर्च पद्धतीऐवजी काँक्रीट गर्डर पद्धतीने या मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. नव्याने मार्ग उभारावा लागणार असून यासाठी किमान दीड महिना लागण्याची शक्यता आहे. यात कंत्राटदाराची चूक असल्याने आता या नव्याने उभारण्यात येणाऱ्या मार्गाचा खर्च कंत्राटदारालाच पेलावा लागणार आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. एमएसआरडीसीने मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.