नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील इमारत क्रमांक २ब, ३ब आणि ४ ब या रिकाम्या करून त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करण्याचा मार्ग अखेर आता मोकळा होणार आहे. या तिन्ही इमारतीतील पात्र पोलीस रहिवाशांना पुनर्विसित इमारतीतील घराची हमी देण्यासाठी मंगळवारी सोडत काढण्यात येणार आहे.

बीडीडी चाळीत पोलिसांची निवासस्थाने असून २०११ पर्यंत वास्तव्यास असलेल्या आणि सेवेत असलेल्या पोलिसांना पुनर्विकासांतर्गत घरे देण्यात येणार आहेत. घरे देण्याची घोषणा यापूर्वी झाली होती. मात्र यासाठीचे धोरण वा लेखी आदेश जाहीर न झाल्याने पोलीस कुटूंबियांकडून नायगावमधील घरे रिकामी करून देण्यास नकार दिला. त्यामुळे इमारती रिकाम्या करणे मुंबई मंडळासाठी अवघड झाले आहे. करारनामा दिल्याशिवाय घरे रिकामी करणार नाही अशी भूमिकाही पोलिसांच्या कुटुंबियांनी घेतली. मात्र सरकारकडून घरांची किंमत निश्चित न झाल्याने करारनामा देणे मंडळाला शक्य झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर पोलिसांना ९५ अ च्या (निष्कासन) नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

करारनाम्याचा प्रश्न मार्गी लागला नव्हता –

करारनाम्याचा प्रश्न मार्गी लागला नव्हता आणि कामास विलंब होत होता. यातून अखेर मंडळाने मार्ग काढून आता पात्र पोलिसांच्या घरांसाठी मंगळवारी सोडत काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मंगळवारी ४ वाजता म्हाडा भवनातील गुलझारीलाल नंदा सभागृहात देखरेख समितीच्या बैठकीत सोडत होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीडीडी संचालक यांच्याकडून पात्र करण्यात आलेल्या पोलिसांना या सोडतीद्वारे पुनर्वसित इमारतीतील हक्काच्या घराची हमी मिळणार आहे. पोलिसांसाठी निघणारी ही पहिली सोडत असेल.