काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत मनसे प्रमुख राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरे यांची भूमिका सुपारीबाज अशी होती, असं म्हणत नाना पटोलेंनी खोचक टोला लगावला. तसेच त्याचा व्हिडीओ देखील सादर केल्याचं नमूद केलं. ते टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, “मी आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांचा मागच्यावेळी व्हिडीओ दाखवला. त्यात राज ठाकरे यांच्याबद्दलची त्यांची भूमिका सुपारीबाज अशी होती. त्यामुळे फडणवीसच मागच्यावेळी कोणाची सुपारी घेतली आणि आत्ता कोणाची घेतली हे सांगतील. आता त्यांना मान्य झालं की आमची सुपारी त्यांनी घेतलीय. राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात असं फडणवीसांचं मत आहे. ते मी व्हिडीओच्या माध्यमातून दाखवलं आहे.”

“आमचा धर्म आम्हाला कोणावर टीका करायला शिकवत नाही”

काँग्रेस नेत्यांना हनुमान चालिसा वाचायला सोनिया गांधींनी परवानगी दिली का? असा प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले, “आम्ही सर्वधर्मसमभावाच्या विचाराला मान्य करतो. आमचं संविधान आम्हाला तेच सांगतंय. आमचा धर्म देखील आम्हाला कोणावर टीका करायला शिकवत नाही. यांचा धर्म वेगळा आहे. दुसऱ्यांच्या धर्मावर टीका करणारी ही लोक आहेत. हे संविधानाला मानणारी लोक नाहीत. त्यामुळे सोनिया गांधी आम्हाला काहीही सांगत नाहीत.”

“मी जाहीरपणे सांगतो की मी रोज सकाळी हनुमान चालिसा वाचूनच घराबाहेर पडतो”

“मी जाहीरपणे सांगतो की मी रोज सकाळी हनुमान चालिसा वाचूनच घराबाहेर पडतो. त्यामुळे आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. प्रत्येकाने आपआपल्या धर्मावर प्रेम करायचा संदेश सोनिया गांधी यांनी आम्हाला दिलाय,” असंही नाना पटोले यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “काँग्रेस नेत्यांना सोनिया गांधींनी हनुमान चालिसा वाचायला परवानगी दिली का?”, नाना पटोले म्हणाले “मी जाहीरपणे सांगतो…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सरकारने धर्मगुरुंना बोलवावं आणि त्यांच्याशी चर्चा करावी”

“सरकारने धर्मगुरुंना बोलवावं आणि त्यांच्याशी चर्चा करून त्या पद्धतीचा निर्णय घ्यावा. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. धर्मगुरू या सर्वगोष्टी मान्य करतील. त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. पण हे धर्माचे ठेकेदार ज्या पद्धतीने वागत आहेत, राज्याला बदनाम करत आहेत ही परंपरा थांबवली पाहिजे. शासनाने शासन केलं पाहिजे,” अशी मागणी पटोले यांनी सरकारकडे केली.