मुंबई: नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आणि संतापजनक आहे. या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यात यावा, जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालावे, अशी शिफारस राज्य बाल हक्क आयोगाकडून करण्यात आली आहे.
या प्रकरणात पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आयोगाकडून स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून घटनेची सविस्तर माहिती घेतली जात असून आवश्यक त्या सूचना देखील दिल्या जात आहेत. आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार आहे. या प्रकरणात न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिली.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप समजण्यासारखा असला तरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहनही आयोगाचे अध्यक्ष यांनी केले आहे. बालिकेला आणि तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आयोग सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे पुराणिक म्हणाले.
