प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्या जाणाऱ्या 'शौर्य' पुरस्काराची सोमवारी घोषणा करण्यात आली. राज्यातील चार बालकांना या पुरस्काराने यंदा सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय बाल कल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिद्धार्थ यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील कोथळीचा निलेश भील, वर्धा जिल्ह्यातील वैभव घांगरे, मुंबईतील वाळकेश्वरचा मोहित दळवी आणि नागपुरच्या गौरव सहस्त्रबुद्धे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यापैकी गौरव सहस्त्रबुद्धे याला मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्करातील सर्वोच्च 'भारत पुरस्कार' गौरव सहस्त्रबुद्धे याला मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. दहावीत शिकणाऱ्या गौरवने नागपूरच्या हिंगणा रोडवरील अंबाझरी तलावात बुडणाऱ्या चार मुलांचे जीव आपल्या प्राणांची बाजी लावून वाचविले होते. याघटनेत त्याचा मृत्यू झाला होता.