यंदाच्या पावसाळय़ात ऑगस्ट महिन्यात श्रीवर्धन- हरिहरेश्वर किनाऱ्यावर थडकलेल्या निर्मनुष्य बोटीमध्ये शस्त्रे आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेने सागरी सुरक्षेवर अनेक प्रश्नचिन्हे उभी केली. त्या घटनेची रीतसर चौकशी करण्यात आली, यामध्ये तीन महत्त्वाच्या त्रुटी राहिल्याने उघड झाले, अशी कबुली भारतीय नौदलाच्या पश्चिमी मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी शनिवारी नौदल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्रुटी लक्षात आल्यानंतर आता तेवढय़ाच तातडीने त्या दूर करण्यासाठीची पावले उचलण्यात आली असून सागरी सुरक्षा कडेकोट करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर संपूर्ण सागरी किनारपट्टीवर रडार यंत्रणांचे जाळे विकसित करण्यात आले. एवढय़ा सुरक्षेनंतरही ही बोट रडारची नजर चूकवत कशी काय पोहोचली, हा प्रश्नच होता. त्याबद्दल व्हाइस ॲडमिरल म्हणाले की, रडार यंत्रणा सध्या महत्त्वाच्या ठिकाणांवर बसविण्यात आली आहे. प्रत्येक रडारची स्वत:ची एक क्षमता असते आणि मर्यादाही. दोन रडार यंत्रणांच्या मध्ये काही अंतर असे आहे जे रडारच्या कक्षेत येत नाही. ही बोट नेमकी याच पट्टय़ातून किनारपट्टीवर येऊन थडकली, असे ते म्हणाले. २०४७ पर्यंत स्वावलंबी होण्याचे नौदलाचे उद्दिष्टनवी दिल्ली : भारतीय नौदल २०४७ पर्यंत स्वावलंबी (आत्मनिर्भर) होईल. तसा शब्द आम्ही सरकारला दिला आहे,’’ असे नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांनी शनिवारी सांगितले. नौदल हिंदू महासागरातील जहाजांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवते, असेही त्यांनी या वेळी सांगितले. ३४० महिला अग्निवीरांचा सहभाग..अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची भरती सुरू आहे. भारतीय नौदलात सुमारे ३ हजार ४७४ अग्निवीर असून त्यापैकी सुमारे ३४० महिला अग्निवीरांचा सहभाग आहे. या सर्वाची सध्या वैद्यकीय तपासणी सुरू असून ती पूर्ण झाल्यावर अग्निवीर नौदलात सहभागी होतील, अशी माहिती सिंग यांनी दिली.