मुंबई : केंद्रातील भाजप सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून व खोटेनाटे आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही निवडक नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. विधिमंडळ अधिवेशनात अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी कितीही गोंधळ घातला तरी, राजीनामा घ्यायचा नाही, उलट विरोधकांना आक्रमक प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आलेल्या मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाचे मंत्री व वरिष्ठ नेते यांची बैठक झाली. नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीची आघाडी राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरला असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ३० नगराध्यक्ष व ३० उपनगराध्यक्ष निवडून आले आहेत. शिवसेनेचे २७ नगराध्यक्ष व १६ उपनगराध्यक्ष विजयी झाले. काँग्रेसला २० नगराध्यक्षपदे व २१ उपनगराध्यक्षपदे मिळाली. भाजपचे २० नगराध्यक्ष व २१ उपनगराध्यक्ष निवडून आले. भाजप दुसरा क्रमांकसुद्धा गाठू शकला नाही, असे तपासे यांनी सांगितले.