मुंबई: छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लक्ष्य केले होते. अशा परिस्थितीत भाजपला जशास तसे उत्तर देण्याचा राष्ट्रवादीचा मनसुबा आहे. यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापुरूषांच्या सन्मानार्थ यात्रा काढत जनतेच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांचा सामना करण्याची मोर्चेबांधणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे. मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या जेष्ठ नेत्यांची बैठक झाली. आमदार अमोल मिटकरी यांनी महापुरुषाबद्दल भाजपा नेत्यांनी वारंवार केलेली अवमारकारक वक्तव्ये, तसेच संभाजी महाराज यांना अजित पवार यांनी ‘स्वराज्य रक्षक’ असा उल्लेख केल्यामुळे पवार यांच्या विरोधात भाजपने केलेले आंदोलन याबद्दल बैठकीत सविस्तर माहिती देत इतिहासातील पुरावे दिले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना झालेली अटक आणि गुन्हा याबाबत वस्तुस्थिती सांगितल्याचे समजते. अशा घटना गंभीर असून याचा पक्षाने याविरोधात रान उठवावे, असा मतप्रवाह देखील पुढे आल्याचे सांगण्यात आले. विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर ज्याप्रमाणे सत्ताधारी पक्षाचे लोक वागत आहेत. काही घटना घडवल्या जात आहेत. त्याची सत्ताधारी लोक वातावरण निर्मिती करीत आहेत. राज्यातील जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे. मात्र जनतेच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नाकडे डोळेझाक केली जात आहे.त्यामुळे या सरकारच्या विरोधात महागाई, बेरोजगारी हे मुद्दे पुढील काळात तीव्रपणे मांडण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करणार आहे. संविधान, कायदा याला अनुसरून देश आणि राज्य चालले पाहिजे. हे मत राष्ट्रवादी कांँग्रेस पक्षाचे आहे.ही भुमिका घेऊन पक्ष जनतेत जाणार आहे.