मुंबई : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे, मात्र त्यासंबंधी सध्याचे कायदे हे पुरेसे आणि प्रभावी नाहीत. काळानुरूप हे कायदे अद्ययावत आणि सक्षम करण्याची आवश्यकता आहे, असे मत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मंगळवारी व्यक्त केले. शहरातील अमली पदार्थ विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासही प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही पांडे यांनी सांगितले. पांडे यांनी प्रेस क्लब येथे माध्यमांशी संवाद साधला. सायबर गुन्ह्यांची नोंद माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत होते. हा कायदा २००० साली लागू झाला. मात्र त्यानंतर २००८ मध्ये त्यात सायबर गुन्हेगारीच्या मुद्दय़ांचा अंतर्भाव करण्यात आला. या कायद्यानुसार निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच गुन्हा नोंदवण्याचा अधिकार आहे. सायबर गुन्ह्यांबाबत स्वतंत्र कायदा नाही. बदलते तंत्रज्ञान आणि त्याच्या वाढलेल्या वापरामुळे सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. अनेक नागरिक विशेषत: ज्येष्ठ नागरिक त्याला बळी पडत आहेत. माहितीचे रक्षण आणि गोपनीयता राखण्याचे आव्हानही आहे. या सर्व मुद्दय़ांचा सखोल विचार असणारा स्वतंत्र कायदा असणे अत्यावश्यक आहे, असे पांडे म्हणाले. शहरातील अमली पदार्थ विक्री, वितरणाचे जाळे नेस्तनाबूत करण्यास प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. मोठय़ा आवाजाचा सर्वच वयाच्या नागरिकांच्या आरोग्यावर, मन:स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. एखादा दिवस तरी नागरिकांची ध्वनिप्रदुषणापासून सुटका व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.