मुंबईः राज्यात वीज पडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. सध्या ४० किलोमीटर परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना ‘दामिनी’ व ‘सचेत’ ॲपद्वारे दिले जात आहे. आता ४०० मीटर परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करण्यात येत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
राज्यात वीज कोसळण्याची संभाव्य पूर्वसूचना देणारी सयंत्रे बसविण्याबाबत संतोष दानवे, समीर कुणावर, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान महाजन बोलत होते.राज्यात पावसाळी वातावरणात वीज पडून होणाऱ्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना याचा सर्वाधिक धोका होत आहे. सन २०२३मध्ये वीज पडून १८१ जणांचा मृत्यू झाला होता. तर गत वर्षी त्यात वाढ होऊन २३६ जणांचा वीज पडून मृत्यू झाला. मुसळधार पावसाबरोबरच वीज कोसळणे आणि वादळी परिस्थिती उद्भवते, यावेळी शेतीकाम करत असताना अनेक वेळा शेतकरी वीज पडण्याच्या दुर्घटनांत बळी पडतात.
वीज पडण्याची पूर्वसूचना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचून जीवित हानी टाळता यावी, यासाठी भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेने विकसित केलेली ‘दामिनी’ आणि ‘सचेत’ ही दोन ॲप्स नागरिकांना वीज पडण्याच्या आधीच ४० किलोमीटर परिघात सावध करणाऱ्या सूचना देतात. सरकारच्या विविध विभागांतर्फे या ॲप्सचा प्रचार व प्रसार सातत्याने केला जात असल्याचे महाजन यांनी सांगितले.
वीज पडून होणाऱ्या मृत्यूंच्या प्रकरणांत आपत्ती मदतीच्या निकषांनुसार आर्थिक सहाय्यही दिले जाते. २०१७ नंतर वीज पडून मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ४ लाखांची मदत, गंभीर जखमी व्यक्तीस २.५ लाखांची मदत, तर जनावरांच्या नुकसानीसाठी गाय/म्हैस/बैल यांना ३७ हजार ५००, मेंढी-शेळीसाठी ४०००, आणि कोंबडीसाठी १०० रुपये अशी भरपाई शासनाकडून दिली जात आहे. ही मदत वाढविण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.