मुंबईत श्वानप्रेमींची संख्या काही कमी नाही. पाळीव कुत्र्यांबरोबरच अनेकदा या श्वानप्रेमींकडून रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनाही आश्रय दिला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांतील भटक्या कुत्र्यांच्या नागरिकांवरील हल्ल्याच्या घटना पाहता आता 'अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया'कडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. श्वानप्रेमींना या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. हे नियम मोडल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद या नियमावलीत आहे. या नियमावलीतंर्गत श्वानप्रेमींना भटक्या कुत्र्यांना पोसायचे असेल तर त्यांची संख्या वाढणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी या कुत्र्यांची नसबंदी करून घ्यावी लागणार आहे. तसेच या कुत्र्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेणेही त्यांच्या मालकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. या अन्नदात्यांवर कुत्र्याचा अधिक विश्वास असल्याने त्यांना डॉक्टरांकडे नेण्याची जबाबदारीही याच 'श्वानप्रेमीं'ची असल्याचे 'अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया'कडून सांगण्यात आले आहे. याशिवाय सोसायटीच्या परिसरात भटक्या कुत्र्यांना उभे न करणे, लहान मुले खेळण्याच्या जागांपासूनही भटक्या कुत्र्यांना दूर ठेवणे, कुत्र्याने अस्वच्छ केलेला परिसर साफ करण्याची जबाबदारी मालकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात भटक्या कुत्र्यांचे 'पालकत्व' स्विकारताना श्वानप्रेमींना विचार करावा लागणार आहे.