मुंबईः दहशवादाला वित्त पुरवठा केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी नुकतेच आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यात देशात मुंबई व इतर प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी हवालाच्या माध्यमातून विदेशातून पैसे पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. दाऊद टोळीने राजकीय नेते आणि व्यावसायिकांसह प्रतिष्ठित व्यक्तींवर हल्ले करून भारतातील लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी एक विशेष गटाची स्थापन केली आहे, तसेच विविध दहशतवादी कारवायांसाठी खंडणी उकळण्यात आली, असे खळबळजनक आरोप एनआयएने केले आहेत. हेही वाचा >>> मुंबई: दाऊदशी संबंध असल्याच्या तक्रारीवरून ‘लिव्ह इन पार्टनर’ अटकेत; तपासात भलताच प्रकार उघड झाल्याने पोलीस चक्रावले एनआयएने अलीकडेच आरिफ अबुबकर शेख ऊर्फ आरिफ भाईजान, शब्बीर अबुबकर शेख आणि मोहम्मद सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट या तिघांना दहशतवादाला वित्तर पुठवठा केल्याप्रकरणी प्रकरणात अटक केली होती. तिघेही छोटा शकीलचे नातेवाईक आहेत. त्यांच्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणेने शनिवारी सत्र न्यायालयात दाऊद टोळीविरोधात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात गुन्ह्यांत सहभागी आरोपी दाऊद इब्राहिम, छोटा शकील यांच्यासह अटक आरोपी आरिफ अबुबकर शेख ऊर्फ आरिफ भाईजान, शब्बीर अबुबकर शेख आणि मोहम्मद सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट यांच्या नावांचा समावेश आहे. काय झाले? दाऊद टोळीने देशातील प्रमुख राजकीय नेत्यांवर हल्ले करण्यासाठी इतर दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या मदतीने हिंदुस्थानात एक विशेष गट स्थापन केल्याची माहिती एनआयएला मिळाली. त्याआधारे तपास यंत्रणेने यावर्षी फेब्रुवारीमध्ये दाऊद इब्राहिम व त्याच्या साथीदारांविरुद्ध नव्याने गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू ठेवला. त्यातून दाऊद टोळीच्या गंभीर कृत्यांची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) तसेच मोक्का कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. आरोपत्रानुसार, देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्यासाठी, मुंबई व अन्य शहरांत हल्ले करून सामान्य लोकांमध्ये दहशत माजवण्यासाठी अटक आरोपींना विदेशात लपून बसलेल्या कुख्यात दाऊद इब्राहिमने हवालाच्या माध्यमातून पैसे पुरवले. तसेच दाऊद टोळीने विविध प्रकारची बेकायदेशीर कृत्ये करून टोळीच्या गुन्हेगारी कारवाया घडवून आणण्याचा कट रचला. अटक आरोपींनी दाऊद इब्राहिम व छोटा शकीलच्या नावाने जीवे मारण्याच्या धमक्या देत खंडणी उकळली. या माध्यमातून दहशतवादी कारवायांसाठी पैसे गोळा केले. तसेच दाऊद इब्राहिमच्या फायद्यासाठी देशातील श्रीमंत लोकांना धमकावण्यात आले, असे आरोप करण्यात आले आहेत.