शैलजा तिवले, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबईत ओमायक्रॉनमुळे वेगाने रुग्णवाढ होत असली तरी तूर्त टाळेबंदी लागू करणे हा पर्याय नाही. त्यामुळेच समतोल साधणारे निर्णय घेत आहोत, असे स्पष्ट करत पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी अर्थचक्र तूर्त सुरळीत राहील, याची ग्वाही ‘लोकसत्ता’शी बोलताना सोमवारी दिली़  मात्र, र्निबध आणखी कठोर करण्याची वेळ येऊ नये, याची काळजी नागरिकांनीच घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केल़े.

‘‘उपाहारगृहे, मॉल, व्यायामशाळा, चित्रपटगृहे बंद करण्याबाबत अनेकांमार्फत विचारणा केली जाते. मात्र, याबाबत निर्णय घेताना अर्थव्यवस्था आणि करोना प्रतिबंधक उपाययोजना याचा समतोल साधणे गरजेचे असत़े   संपूर्ण मुंबई बंद करणे, कोणालाही घराच्या बाहेर पडू न देणे असे निर्णय घेणे सोपे आहे. किंबहुना हा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. परंतु, मुंबई ठप्प करण्याच्या या पर्यायाचा विचार सध्या तातडीने करणे योग्य नाही़  कारण त्याची खूप मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते’’, असे चहल यांनी स्पष्ट केले. 

नागरिकांनी करोना प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन केले नाही, रुग्णसंख्या वाढली तर नाईलाजाने कठोर र्निबधांचा विचार करावा लागेल, असा इशाराही चहल यांनी दिला़  दुसऱ्या लाटेमध्ये मुंबईतील बहुतांश नागरिकांनी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले. त्यामुळे १५ एप्रिलच्या दरम्यान जेव्हा दुसऱ्या लाटेने उच्चांक गाठला तेव्हा मुंबईत सुमारे ९३ हजार उपचाराधीन रुग्ण होते. दैनंदिन रुग्णसंख्या ११ हजार १०० च्या वर कधीही गेली नाही. मुंबईच्या शेजारी असलेल्या पुण्याची लोकसंख्या तुलनेने कमी असूनही तिथे दैनंदिन रुग्णसंख्या १९ हजारांवर गेली तर दिल्लीतील दैनंदिन रुग्णसंख्या २७ हजारांवर गेली. त्यादृष्टीने मुंबईचे नागरिक हे अधिक जबाबदार असून, त्यावेळी त्यांनी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केल्यामुळे संसर्ग प्रसार तुलनेने कमी राहिला. आता यावेळीही नागरिकांनी  नियम पाळले तर टाळेबंदी लागू करण्याची आवश्यकता भासणार नाही, असे चहल म्हणाल़े

पुढील दोन आठवडे आव्हानात्मक

जगभरात ज्या देशांमध्ये ओमायक्रॉनमुळे लाट आली तेथे साधारण चार ते पाच आठवडे तिचा प्रभाव राहिल्याचे दिसते. मुंबईत आता दोन आठवडे उलटून गेले आहेत. त्यानुसार पुढील तीन चार आठवडय़ांमध्ये लाट ओसरायला सुरूवात होईल. परंतु पुढील दोन आठवडे अधिक आव्हानात्मक असणार आहेत. या काळात ही लाट उच्चांक गाठण्याची शक्यता आहे, असे मत चहल यांनी व्यक्त केले.

मुंबईत स्थिती नियंत्रणात

रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढली तरी त्या तुलनेत १० टक्के रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत आहे. तसेच बहुतांश रुग्ण सात दिवसांमध्ये बरे होत असल्यामुळे प्राणवायू आणि खाटांची आवश्यकता कमी भासत आहे. त्यामुळे सध्या मुंबईत स्थिती नियंत्रणात आहे. रुग्णसंख्या याच गतीने वाढली तरी मुंबईत उपलब्ध असलेल्या ३० हजार खाटा पुरेशा असतील, असा अंदाज आहे, असे चहल यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांना तयारी करण्याचे आदेश

 शहरातील १४४ खासगी रुग्णालयांना करोनाबाधित रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आवश्यकता भासल्यास २४ तास आधी नोटीस देऊन ८० टक्के खाटा पालिका ताब्यात घेईल. त्याबाबतही रुग्णालयांना कल्पना दिली आहे, असे चहल यांनी सांगितले.

ठाण्यात सर्वाधिक लसीकरण

राज्यभरात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १९ हजार ८२९ मुलांचे लसीकरण सोमवारी करण्यात आले. या खालोखाल पुण्यात १७ हजार २७६, नगरमध्ये १६ हजार १२७ तर सांगलीमध्ये १४ हजार ४५० मुलांना लस देण्यात आली. मुलांच्या लोकसंख्येनुसार, सांगलीमध्ये सर्वाधिक म्हणजे १० टक्के मुलांचे लसीकरण झाले आहे. त्या खालोखाल धुळे, नगर, पालघर, कोल्हापूर, बीड, यवतमाळ आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.

चंद्रपूरमध्ये कमी प्रतिसाद

राज्यात सर्वात कमी प्रतिसाद चंद्रपूर जिल्ह्यात मिळाला असून मुलांच्या लोकसंख्येनुसार या जिल्ह्यात केवळ ०.२ टक्के(२३७) मुलांचे लसीकरण झाले आहे. त्या खालोखाल वाशिम, जालना, नंदुरबार, भंडारा, वर्धा येथे एका टक्क्यापेक्षाही कमी लसीकरण झाले आहे. सोमवारी संध्याकाळी साडे सहापर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुंबईतही ०.९ टक्के (५६९०) मुलांचे लसीकरण झाले.

देशभरात ३८ लाख मुलांना लाभ

किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी देशात सुमारे ३८ लाख मुलांना लसलाभ मिळाला़ देशात दिवसभरात सुमारे ९५ लाख नागरिकांचे लसीकरण झाल़े त्यात ३८ लाख मुलांचा समावेश आह़े मुलांच्या लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत़े त्यामुळे लसीकरण मोहिमेलाही गती मिळाली आह़े

८० टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे

राज्याच्या कृती दलाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईत ८० टक्के रुग्ण हे ओमायक्रॉन बाधित आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत मुंबईत हे प्रमाण १०० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉन हा वेगाने डेल्टाला संपुष्टात आणत आहे. डेल्टा खूप घातक होता. फुप्फुसावर आघात करत असल्यामुळे प्राणवायूची आवश्यकता जास्त भासत होती. त्या तुलनेत ओमायक्रॉनची तीव्रता कमी आहे. मृत्यूदर तर कमी आहेच, शिवाय प्राणवायूची गरजही तुलनेने फार जास्त नाही. फक्त हा विषाणू वेगाने पसरत असल्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. रुग्णसंख्या आवाक्याबाहेर जाऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चहल म्हणाले.

राज्यात १२,१६० नवे रुग्ण

मुंबई : राज्यात सलग पाचव्या दिवशी करोना रुणसंख्येत वाढ नोंदविण्यात आली आहे. दिवसभरात १२,१६० नवे रुग्ण आढळले असून, ओमायक्रॉनचा संसर्ग ६८ जणांना झाल्याचे निष्पन्न झाले. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शहरात आठ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No immediate lockdown in mumbai bmc commissioner iqbal singh chahal zws
First published on: 04-01-2022 at 04:56 IST