नंदूरबारच्या अनोख्या संकल्पनेची नीती आयोगाकडून दखल मुंबई: नंदूरबार जिल्ह्यात आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या ३० आश्रमशाळा तसेच एकलव्य शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मध्यवर्ती उपहारगृहामुळे (सेंट्रल किचन) विद्यार्थ्यांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याची विशेष दखल शनिवारी नीती आयोगाने घेतली. या उपक्रमाचा उत्तम संकल्पना म्हणून निती आयोगाने गौरव केला आहे. त्यावेळी राज्याच्या सर्वसमावेश प्रगतीसाठी विविध क्षेत्रातील विकासाच्या दऱ्या सांधल्या जाणे आवश्यक असून सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्य आणि समन्वयातून सांघिक प्रयत्न करावेत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील काही आकांक्षित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. दूरिचत्रसंवादाच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यसचिव, गडचिरोली, नंदुरबार उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदूर्ग, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. आकांक्षित जिल्ह्यांना विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न नेटाने होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी त्या-त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदनही केले. आकांक्षित नसलेल्या पण विविध विकास निर्देशांकामध्ये एक किंवा दोन निर्देशांकात मागे असलेल्या देशातील १४२ जिल्ह्यांची निवड केंद्र सरकारने केली आहे. या जिल्ह्यांच्या विकासाकडेही केंद्र शासन विशेष लक्ष देणार असून काही उद्दिष्टांची निश्चिती करत आहे. त्यांनी आकांक्षित जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतूक करताना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांच्या आयुष्यातील चांगल्या बदलाचे साक्षीदार होण्याचे आवाहन मोदी यांनी केले.