मुंबई : जुहू किनाऱ्यावर काही दिवसांपूर्वी तेलासारखा काळसर पदार्थ आढळून आला असून त्यामुळे समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता आणि पर्यावरणावर त्याचा परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जुहू किनाऱ्यावर मागील दोन तीन वर्षांपासून हा प्रकार घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दोन दिवसांपूर्वी स्थानिक नागरिक किनाऱ्यावर चालताना काळसर थर किनाऱ्यावर दिसल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही असाच काळसर थर किनाऱ्यावर दिसून आला होता. त्यामुळे ही तेलगळती नेमकी कुठून होते याचा शोध घेण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणामुळे समुद्री जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे असे मत ‘जुहू रिस्पॉन्सिबल रेसिंडंट्स’च्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याचा तपास करावा आणि त्यावर कायमचा तोडगा काढावा, असेही म्हटले आहे. दरम्यान, मुंबईच्या किनारपट्टीवर वेळोवेळी तेलगळतीच्या घटना घडत असतात. त्यामुळे समुद्री पर्यावरणावर आणि स्थानिक मत्स्य व्यवसायावर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते प्रशासनाने या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
तेलगळती कशामुळे
ही तेलगळती स्थानिक जहाज वाहतुकीमधून किंवा बंदरात अभ्या असलेल्या जहाजातून झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पर्यावरणावर संभाव्य परिणाम
समुद्रातील जैवविविधतेसाठी ही धोक्याची घंटा असून समुद्रातील प्रजातींच्या अस्तित्वावरही याचा परिणाम होऊ शकतो. तेल पाण्यावर पसरल्याने सूर्यप्रकाश समुद्राच्या आत पोहोचत नाही. यामुळे प्लवक आणि लहान जीवांचे जीवनचक्र थांबते. याचा परिणाम संपूर्ण समुद्री अन्नसाखळीवर होतो.
टार बॉल्सचा प्रादुर्भाव
जुलै-ऑगस्ट २०१८ या कालावधीत जुहू किनाऱ्यावर टार बॉल्सचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. या कालावधीत किनाऱ्यावर आलेल्या कचऱ्यावरही तेलाचा घर आढळला होता. या प्रकारामुळे समुद्री पर्यावरणावर नकारात्मक परिणामही झाला.
२०२१ मध्येही तेलगळती
ऑगस्ट २०२१ मध्ये जुहू किनाऱ्याच्या सुमारे ५ किलोमीटरच्या पट्ट्यावर वाळू काळसर झाल्याचे आढळले. स्थानिक नागरिकांच्या सकाळी चालनताना ही गोष्ट लक्षात आली होती. तेलगळतीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.
एम व्ही रॅक तेलगळती
एम व्ही रॅक हे जहाज २०११ मध्ये मुंबईच्या किनाऱ्याजवळ बुडाले. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर तेलगळती झाली. या दुर्घटनेतून सांडलेले तेल समुद्राच्या प्रवाहामुळे जुहू किनाऱ्यावर पोहोचले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार जुहू किनाऱ्याच्या सुमारे ५.८ किलोमीटरच्या पट्ट्यावर तेलाचा थर आणि टार बॉल्स आढळले होते.