मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ या मुंबईतील पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पाअंतर्गत मंगळवारी प्रथमच भुयारी मार्गावरून मेट्रो धावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या मेट्रो गाडीला हिरवा झेंडा दाखविला आणि सारिपूत ते मरोळ अशी तीन किमीचा पल्ला या मेट्रो गाडीने गाठला. मेट्रो ३ प्रकल्पातील पहिल्या मेट्रो गाडीची, भुयारी मार्गिकेची चाचणी यशस्वी झाली आणि मुंबईकर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. आता मुंबईकरांना या मेट्रो गाडीतून भुयारी मार्गिकेवरून वेगवान प्रवास करण्याची प्रतीक्षा आहे. पण यासाठी मुंबईकरांना डिसेंबर २०२३ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : म्हाडा सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेत बदल; राज्यातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) माध्यमातून ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम २०१६ पासून हाती घेण्यात आले आहे. ही मार्गिका २०२१ मध्ये वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणी, आव्हानात्मक कामे आणि कारशेडचा वाद आदी कारणांमुळे प्रकल्प पूर्णत्वास विलंब झाला आहे. पण आता मात्र एमएमआरसीने या मार्गिकेतील आरे कारशेड ते बीकेसी असा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये सुरू करण्याचा निर्धार केला आहे.

PHOTOS : … अन् मुंबईत प्रथमच भुयारी मार्गावरून मेट्रो धावली

तर दुसरीकडे आरे कारशेडच्या कामालाही सुरुवात करण्यात आली असून कारशेडचे काम जून २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एकूणच डिसेंबर २०२३ मध्ये पहिला टप्पा सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने एमएमआरसीने मंगळवारी मेट्रो ३ ची चाचणी करून एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले.

हेही वाचा… “मेट्रो कारशेडचा वाद पर्यावरणापेक्षा…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र!

कोणताही मेट्रो प्रकल्प सेवेत दाखल करण्यासाठी चाचणी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतरच मेट्रो मार्गिकेला आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे मंगळवारीची यशस्वी चाचणी मेट्रो ३ चा पहिला टप्पा दृष्टीक्षेपात आणण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.