मुंबई : करोना निर्बंधांमुळे होणाऱ्या नुकसानाची धग कमी करण्यासाठी राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना १,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने एक महिन्यापूर्वी घेतला होता. हे अनुदान चालकांना त्वरित मिळणार आहे. रिक्षाचालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाइन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक (लायसन्स) आणि आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले. त्यात रिक्षातील प्रवासी वाहतुकीवरही निर्बंध आले. परिणामी चालकांचे उत्पन्न कमी झाले. राज्यात सात लाख पंधरा हजार रिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी १५०० रुपयेप्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाकडून १९ एप्रिल २०२१ ला घेण्यात आला ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. याबाबत आयसीआयसीआय बँकेमार्फत तयार करण्यात आलेल्या प्रणालीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. रिक्षाचालकांना २२ मे पासून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. रक्कम देण्यासाठी शासनाकडून संपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. रक्कम थेट बँक खात्यात ज्या रिक्षाचालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांना एक वेळचे अर्थसाहाय्य त्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा होणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.