नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात भल्या पहाटे खरेदीसाठी जाणाऱ्या फेरीवाल्यांना लुटणाऱ्या अल्पवयीन मुलांपैकी एकाचा लोकलच्या धडकेने मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी घडली. या टोळीतील एका मुलाला नवी मुंबई रेल्वे पोलिसांनी अटक केली
मानखुर्द येथील लल्लभाई कम्पाऊंडमधील ही सर्व मुले होती. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पहाटे ही मुले प्रभादेवीला गेली होती. तेथून परत येताना त्यांनी फेरीवाल्यांना लुटण्याचा प्रयत्न केला.
हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल गाडीतून पहाटे तीननंतर अनेक फेरीवाले घाऊक भाजी व फळे खरेदी करण्यासाठी एपीएमसी बाजारात येत असतात. मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सीएसटीवरून सुटलेली पनवेलकडे जाणारी गाडी मानखुर्द रेल्वे स्थानकात आली असता दहा-बारा तरुण  मालडब्यात घुसले. त्यांनी फेरीवाल्यांना धमकावून रोख रक्कम आणि मोबाइल फोन हिसकावून घेतले. त्यानंतर ते जवळच्या महिला डब्यात चालत्या गाडीतून खिडकीला लटकून जात असताना महिलांनी आरडाओरड केली. त्यामुळे या चोरटय़ांनी रेल्वेची साखळी खेचली. ठाणे खाडी पूल ओलांडल्यानंतर गाडीची गती कमी झाल्याने या टोळक्यातील अनेकांनी उडय़ा मारल्या. त्याचवेळी विरुद्ध दिशेने सीएसटीला जाणाऱ्या गाडीचा धक्का लागल्याने अक्षय शिर्के १९  हा जागीच ठार झाला, तर फेरीवाल्यांनी एका तरूणाला  पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.