ठाण्यात सोमवारी दुपारी एका गोविंदाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. राजेंद्र आंबेकर (वय ४९) असे त्यांचे नाव आहे. लालबाग येथे राहणारे राजेंद्र आंबेकर दहीहंडीसाठी गोविंदा पथकाबरोबर ठाण्यात दाखल झाले होते. सोमवारी दुपारी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित केले. 
दरम्यान, मुंबई आणि ठाण्यात सोमवारी अनेक ठिकाणी गोविंदा जखमी झाल्याच्या घटना घडल्या. आतापर्यंत गोविंदा जखमी झाल्याच्या ९३ घटनांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी २८ गोविंदांना उपचारासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यंदा न्यायालयाच्या निर्बंधांमुळे अनेक ठिकाणच्या आयोजकांनी दहीहंडी उत्सव रद्द केल्याचे चित्र दिसत आहे. दहीहंडी उत्सवासाठी ओळख असलेल्या ठाणे शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत हंड्यांचे प्रमाण बरेच कमी आहे. त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी ठाण्यात होणारी वाहतुकीची कोंडीसुद्धा यावर्षी काही प्रमाणात कमी झालेली पाहायला मिळली. सर्वोच्च न्यायालयाने यंदा १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडी उत्सवात सामील होण्यास घातलेल्या बंदीमुळे दहीहंडी पथकातील बालगोविंदांना १३ वर्षांचे असल्याचा दाखला घेऊन फिरावे लागत आहे.