|| रेश्मा शिवडेकर

मुंबई : तांत्रिक तयारी नसताना इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्याचा अट्टहास निकालाचे संके तस्थळ कोलमडून पडण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका या प्रकारची चौकशी करणाऱ्या समितीने ठेवला आहे.

‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’चा दहावीचा निकाल १६ जुलैला ऑनलाइन जाहीर करण्यात येणार होता. मात्र निकाल जाहीर होण्याच्या (दुपारी १ वाजता) आधीच म्हणजे दुपारी १२.५८च्या सुमारास मंडळाचे संकेतस्थळ कोलमडून (क्रॅश) पडले होते. ते पाच-सहा तासांनी म्हणजे सायंकाळच्या सुमारास पूर्वपदावर आले. तोपर्यंत या परीक्षेला बसलेले १६ लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक, शाळाचालक निकाल पाहता येत नसल्याने चांगलेच हवालदिल झाले. मंडळाने दहावी-बारावीचे निकाल ऑनलाइन लावण्यास सुरुवात केल्यानंतर असे प्रथमच घडत होते. या अभूतपूर्व गोंधळानंतर शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून या प्रकाराचा छडा लावण्याचा निर्णय घेतला. या समितीचा अहवाल विभागाला सादर करण्यात आला आहे. मंडळाची तांत्रिक तयारी नसताना निकाल जाहीर करण्याची घाई या गोंधळाला कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. त्याचबरोबर अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून करावयाच्या तांत्रिक उपाययोजनाही समितीने सुचविल्या आहेत.

दहावीच्या निकालादरम्यान आलेल्या अनुभवातून शहाणे होत मंडळाने बारावीचा निकाल (३ ऑगस्टला) ऑनलाइन जाहीर करताना पुरेशी तांत्रिक काळजी घेतली. बारावीला  १३ लाख विद्यार्थी असताना निकाल ऑनलाइन जाहीर झाल्या झाल्या अवघ्या तासाभरात तब्बल साडेतीन कोटी ‘हिट्स’ आल्याचे त्यावेळी दिसून आले. हा आकडा सायंकाळी साडेसातपर्यंत पाच कोटी हिट्सवर गेला. हा एक प्रकारे ‘सायबर हल्ला’ असल्याचा संशयही त्यावेळी व्यक्त झाला. मात्र सायबर हल्ल्याची शक्यता समितीने फे टाळून लावली असून मंडळाची अपुरी तांत्रिक तयारीच यास कारणीभूत असल्याचे स्पष्ट के ले आहे.

बारावी निकालादरम्यान संकेतस्थळ कोलमडू नये म्हणून मंडळाने आपल्याच पाच वेगवेगळ्या संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली. ही क्षमताही प्रत्येकी १ कोटी हिट्सपर्यंत वाढविण्यात आली. ही उपाययोजना दरवर्षी के ली जाते. मात्र, दहावीच्या निकालादरम्यान एकाच संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय के ली गेल्याने संके तस्थळ कोलमडले, असे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. याबाबत शालेय शिक्षण आयुक्त  विशाल सोलंकी यांच्याकडे विचारणा के ली असता त्यांनी अहवाल सरकारला सादर के ल्याचे स्पष्ट के ले. मात्र, अहवालातील तपशील आपल्याला जाहीर करता येणार नाही, अशी प्रतिक्रि या दिली.