मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची भाजपची राज्यपालांकडे मागणी मुंबई: वित्त विभागाचा विरोध डावलून अनधिकृत बांधकामाबद्दलचा दंड आणि व्याज माफ करून महाविकास आघाडी सरकारने शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून देताना मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त करून सबंधित मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शनिवारी केली. आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील पोखरण रोड क्र. १ येथे उभारलेल्या ‘छाबय्या विहंग गार्डन’ या गृहसंकुलातील अनधिकृत बांधकामासाठी ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड व त्यावरील व्याज वित्त विभागाचा विरोध डावलून माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी घेतला आहे. त्यावरून भाजपने राज्यपालांकडे तक्रार केली असून लवकच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन सरनाईक यांना थेट लाभ देण्याबाबत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा. याप्रकरणी राज्याच्या अर्थखात्याने अनेक आक्षेप घेतले होते पण त्याकडे दुर्लक्ष करून मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. राज्यपालांनी त्यांना शपथ दिलेली असल्याने त्यांच्याकडे कारवाईची मागणी केल्याचे पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी लोकायुक्तांकडे दाद मागणार आहोत तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.