मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर पडणारा ताण तसेच नवी मुंबई विमानतळ सुरू होण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन लंडनच्या धर्तीवर पालघरमध्ये छोटय़ा विमानांसाठी सॅटेलाईट विमानतळ उभारण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. या विमानतळाच्या सर्वेक्षण- उभारणीला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विमानतळ विकास कंपनीला दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानपत्तनच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंग, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अन्बलगन आदी उपस्थित होते.

राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोल्हापूर, चिपी (सिंधुदुर्ग), नांदेड, गोंदिया व नाशिक विमानतळावरून विमानसेवा सुरू असून देशातील प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या शिर्डी विमानतळाने ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार करून गौरवास्पद कामगिरी केल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या कामगिरीबद्दल ‘बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर’ या श्रेणीत भारत सरकारकडून एमएडीसीला मिळालेले पारितोषिक मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना प्रदान केले.

मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी पालघर येथे सॅटेलाईट विमानतळ उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पाबद्दल तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या. राज्यातील विमानतळ विकासासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखडय़ातील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. शिर्डी येथून कार्गोने भाजीपाला, फुले व फळे बंगलोर,चेन्नई व दिल्ली येथे पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत शिर्डीवरून कार्गोने १ लाख ७० हजार किलो  शेतमाल देशाच्या इतर भागात नेण्यात आला, ही कौतुकाची बाब आहे.  समृद्धी महामार्गामुळेही नजीकच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या विमानवाहतूकीस चालना मिळेल. त्यामुळे या भागातील प्रस्तावित प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत. कोल्हापूर-रत्नागिरी येथील विमानतळ विस्तारीकरण, अमरावती विमानतळ धावपट्टीची लांबी वाढविणे ही कामे देखील गतीने करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. त्यावर अमरावरी विमानतळाची धावपट्टी १३७२ मीटरवरून १८५० मीटपर्यंत वाढविण्याचे काम सप्टेंबपर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच दिवाळीपासून येथून अलायन्स एअरलाईन्सने येथून विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती यावेळी कपूर यांनी दिली.

मुंबईतील उड्डाणे पूर्ववत

मुंबई : पावसाळय़ापूर्व कामांसाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (मुंबई विमानतळ) सहा तास बंद ठेवलेल्या दोन्ही धावपट्टय़ा मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास विमान सेवांसाठी खुल्या करण्यात आल्या. देखभाल, दुरुस्तीच्या कामानंतर मुंबई विमानतळावरील देशांर्तगत तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुन्हा पूर्ववत झाली. या कामानिमित्त सहा तासांत १५० विमान सेवांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.

मंगळवारीही सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विमानतळावरील दोन्ही धावपट्टय़ा बंद ठेवण्यात आल्या. या सहा तासांत देखभाल, दुरुस्तीचे काम होण्यासाठी सुमारे १५० विमान सेवा रद्द करतानाच काहींच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले. या विमानतळावर सध्या दररोज ७७० विमान फेऱ्या होतात.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar third airport amravati airport starts diwali passengers ysh
First published on: 11-05-2022 at 00:02 IST