ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा चालविणाऱ्या कन्या पंकजा मुंडे-पालवे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असेल तरच लोकसभा निवडणूक लढविण्यात रस असल्याचे समजते. वडिलांप्रमाणेच ओबीसींचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपला उपयोग होऊ शकेल, पण केंद्रात मंत्रिपद मिळणार नसल्यास कुटुंबातील अन्य सदस्याकडून लोकसभा निवडणूक लढविण्याच्या पर्यायाचा विचार मुंडे कुटुंबियांकडून केला जाण्याची शक्यता आहे.
मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड मतदारसंघातील पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीच्या वेळीच होण्याची शक्यता आहे. ही जागा मुंडे कुटुंबाच्या सदस्याला भाजपकडून दिली जाणार आहे. आपण महाराष्ट्रात नेतृत्व करावे आणि पंकजा यांनी दिल्लीत आपला वारसा चालवावा, अशी मुंडे यांची इच्छा होती. त्यामुळे पंकजा मुंडे लोकसभेची पोटनिवडणूक लढतील. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणी लढल्यास ही निवडणूक कठीणही होऊ शकते. पण निव्वळ खासदार म्हणून दिल्लीला जाण्यापेक्षा विधानसभा निवडणूक लढविली आणि राज्यात सत्ता आली तर पंकजा मुंडे यांना निश्चितपणे मंत्रिपद मिळेल. त्यामुळे केंद्रात मंत्रिपद मिळणार नसेल, तर खासदारकीची निवडणूक कुटुंबातील अन्य सदस्याने लढवण्याच्या पर्यायाचा विचार मुंडे कुटुंबियांकडून केला जाऊ शकतो.
विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाच्या मतांचे गणित जमविणे आणि या समाजाला पक्षासोबत ठेवणे, ही भाजपची गरज आहे. पंकजा मुंडे मंत्री झाल्यास त्याचा आणि मुंडे यांच्याबद्दल सर्वसामान्यांना असलेल्या सहानुभूतीचा उपयोग विधानसभेसाठी भाजपला होईल. त्यामुळे प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून पंकजा यांना लोकसभेची उमेदवारी देऊन मंत्रिपदही द्यावे, यासाठी प्रदेश भाजपमधील नेते प्रयत्नशील आहेत.
निव्वळ खासदार म्हणून जाण्यापेक्षा विधानसभा निवडणूक लढविली आणि राज्यात सत्ता आली तर पंकजा मुंडे यांना निश्चितपणे मंत्रिपद मिळेल. त्यामुळे केंद्रात मंत्रिपद मिळणार नसेल, तर खासदारकीची निवडणूक कुटुंबातील अन्य सदस्याने लढवण्याच्या पर्यायाचा विचार मुंडे कुटुंबियांकडून केला जाऊ शकतो.