मुंबई : मुंबईत १९९३ मध्ये मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी एखादे वाक्य बोलून दंगली रोखल्या असतील, त्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचवले असतील, तर त्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दु:ख वाटण्याचे कारण काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. फडणवीस यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भामध्ये काही ट्विट केले, त्याला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत १९९३ मध्ये बारा साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांनी तातडीने दूरदर्शनवरून मुंबईत तेरा स्फोट झाले असून तेरावा स्फोट हा मस्जिद बंदर या मुस्लीमबहुल वस्तीत झाला अशी घोषणा केली होती. त्या निवेदनामुळे मुंबईमध्ये हिंदू, मुस्लीम यांच्यातील क्लेश टळला आणि शेकडो लोकांचे प्राण वाचले. त्यानंतर मुंबई शांत झाली व जनजीवन पूर्वपदावर आले. त्यावेळी पवार यांच्या या चतुराईचे श्रीकृष्ण आयोगानेदेखील समर्थन केले होते, असे तपासे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना जातीवादी आहेत असा फडणवीस यांचा एकंदरीत सूर होता. मात्र महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ पाहता आता पक्षाला जातीवादी घोषित करणे एवढंच भाजपकडून बाकी होते आणि त्याची सुरुवात भाजपचा नवीन ‘फ्रंटमॅन’ राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये केली आहे, अशी टीकाही महेश तपासे यांनी केली.