टीकाकारांना काही वाटूदे, प्रसारमाध्यमांनी काहीही टीका करूदेत मात्र महाराष्ट्रात आपलेच सरकार येणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एवढेच नाही तर देशातही पंतप्रधान नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असेही त्यांनी म्हटले आहे. देशातील गरीब आणि सामान्य जनतेचा विश्वास हा भाजपावर आणि एनडीएवर आहे त्यामुळे पुन्हा भाजपाचीच सत्ता येईल असा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईतील एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी रोखठोक प्रश्नांना रोखठोक उत्तर दिले.

नारायण राणे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता तुम्ही आमच्याशी सवतीप्रमाणे वागत आहात त्यामुळे आम्हाला त्यांनी घेतले असे उत्तर देताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. गृहमंत्री म्हणून तुम्ही यशस्वी ठरलात का? हा प्रश्न विचारला असता गेल्या काही तीन ते साडेतीन वर्षातला गुन्हेगारीचा आलेख पाहा तुम्हाला फरक लक्षात येईल. गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांकडेच हवे असते नाहीतर अनेक अडचणी निर्माण होतात हा सल्ला मला दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला होता. तो लक्षात घेऊनच मी गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवले आहे. गृहखात्याचे अनेक निर्णय हे मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय घेतले जातच नाहीत म्हणून ते खाते माझ्याकडे आहे त्या खात्याचे काम उत्तमपणे सुरु आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.