मुंबई : ‘आयआयटी’सारख्या संस्था या तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासाची केंद्रे आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शोधण्यासाठी या संस्थांतर्फे राबवण्यात येणारी प्रवेशप्रक्रिया शिस्तबद्ध असते. त्यात आपण हस्तक्षेप करू इच्छित नाही, असे उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच परीक्षेचे नियम सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखेच असल्याचे नमूद करून संबंधित याचिका फेटाळली.
तसेच तांत्रिक बिघाडाच्या कारणास्तव ‘आयआयटी’च्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांला न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला.ग्रामीण भागात राहत असल्याने तेथील वीजपुरवठा वारंवार खंडीत होतो. परिणामी दिलेल्या मुदतीत आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता आला नाही, असा दावा अथर्व देसाई या विद्यार्थ्यांने याचिकेद्वारे केला होता. तसेच प्रवेश परीक्षेसाठीचा त्याचा नोंदणी अर्ज स्वीकारण्याचे आदेश देऊन ४ जून रोजी होणाऱ्या प्रवेश परीक्षेला आपल्याला बसू द्यावे, अशी मागणी त्याने केली होती.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.