मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांनी ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली आहे. अद्याप काही शेतकरी तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता अथवा इतर वैयक्तिक कारणांमुळे अर्ज दाखल करू शकलेले नाहीत. या बाबींचा विचार करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ वरून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कोकण विभागातून सर्वात कमी प्रतिसाद
राज्यातील आठ कृषी विभागांच्या आकडेवारीनुसार कोकण विभागातून १,०२,३३५, नाशिक विभागातून ३,३३,३८५, पुणे विभागातून ६,०७,६६३, कोल्हापूर विभागातून २,४०,२५३, छत्रपती संभाजीनगर विभागातून १३,२५,०००, लातूर विभागातून २,४२,८२६, अमरावती विभागातून ६,९१,९७३ आणि नागपूर विभागातून ४,५३,३८३ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे.
एकूण ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकरी या योजनेत सहभागी झाले असून, मराठवाडा विभागातून सर्वाधिक तर कोकण विभागातून सर्वात कमी प्रतिसाद मिळाल्याचे या आकडेवारी दिसून येते. पीक कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टल किंवा जवळच्या सेवा केंद्रामार्फत १० ऑगस्ट २०२६ पूर्वी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
एल निनोच्या पार्श्वभूमीवर पीक विमा महत्त्वाचा
राज्यातील एकही पात्र शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, ही राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना अद्याप अर्ज करता आलेला नाही, त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेत कोणताही विलंब न करता १० ऑगस्टपूर्वी पीक विम्यासाठी अर्ज करावा. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट तसेच हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणारी महत्त्वाची योजना आहे.
कोणताही पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी कृषी विभाग सर्वतोपरी सहकार्य करत असून, सर्व शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ अर्ज करावा. पीक विमा योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी PMFBY Crop Insurance App डाउनलोड करावा किंवा http://www.pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज सादर करावा, असेही भरणे यांनी म्हटले आहे.
