मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कोपर पुलाचे उद्घाटन केले. मात्र कल्याण डोंबिवलीतील कंत्राटदारांच्या कामावर कोपर पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कारण कामाची घाई आणि निष्क्रिय गुणवत्ता पुलावर पडलेल्या खड्डयातून समोर आली आहे. कोपर पुलाच्या बांधकामाचे श्रेय घेणारे नेते आता या पहिल्या खड्ड्याचे श्रेय घेतील का? असा प्रश्न नागरिक सोशल मीडियावर विचारत आहेत. यासोबतच सोशल मीडियावर नागरिकांनी कोपर पुलावर पडलेल्या खड्ड्याची छायाचित्रे व्हायरल करून नेत्यांना पद्धतीने लक्ष्य करत महानगरपालिकेवर टीका केली आहे. दरम्यान, यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. महानगरपालिकेने म्हटले आहे की, "डोंबिवली पूर्व-पश्चिमेस जोडणारा कोपर उड्डाणपूल कोविड कालावधीत महापालिकेने १ वर्ष ४ महिने इतक्या कमी कालावधीत पूर्ण केला. या ब्रिजवरील डांबरीकरणामध्ये मास्टीक अस्फाल्टचा अंतर्भाव असतो. परंतु मास्टीक अस्फाल्टचे काम पूर्ण होण्यासाठी साधारणत: एक महिन्याचा कालावधी लागतो आणि यासाठी कडक ऊनाची आवश्यक असते, गणेशोत्सवापूर्वी सदर पूल वाहतूकीस सूरु करण्यात यावा आणि नागरिकांना सुविधा देण्यात यावी या हेतूने मास्टीक अस्फाल्टचे काम प्रलंबित ठेवण्यात आले आणि अस्फाल्टींग बिटूमनचा एक थर देऊन उड्डाणपूल वाहतूकीस सुरु करण्यात आला." मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते उद्घाटन वाहतूक सुरळीत चालू "तसेच ब्रिजवर काम करतांना मोठया प्रमाणात पाऊस येत होता. त्यामुळे कोपर पूलावर काही ठिकाणी खड्डे पडणे अपेक्षित होते. आज पडलेला खड्डा हा रेल्वेच्या एक्स्पाशन जॉइंटच्या बाजूला आहे, तो तातडीने भरुन घेतला असून वाहतूक सुरळीत चालू राहील, याची दक्षता घेण्यात आली आहे. दसऱ्यानंतर पाऊस थांबल्यानंतर कडक ऊनात मास्टीक अस्फाल्टचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सदर दुरुस्तीकाम स्वखर्चाने करणे संबंधित कंत्राटदारास बंधनकारक असेल", असे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शहर अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे.