मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील महिलांशी जवळीक साधून त्यांच्याशी लग्न करणाऱ्या संतोष वाळुंज ऊर्फ प्रदीप या २१व्या शतकातील लखोबा लोखंडे याचा नवी मुंबई पोलीस शोध घेत आहेत. त्याने आठ महिलांना फसवून त्यांच्याकडील सोने, दागिने, पैसे घेऊन पोबारा केला आहे.
मराठी रंगभूमीवर ८०च्या दशकात आचार्य अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच’ हे नाटक गाजले होते. त्यात प्रभाकर पणशीकर यांनी लखोबा लोखंडेच्या विविध व्यक्तिरेखा साकारल्याने त्यांची ती भूमिका अजरामर झालेली आहे.  संतोष वाळुंज या पुणेरी तरुणाने कधी सीआयडी, कधी नेव्ही, कधी कस्टम अधिकारी बनून आठ महिलांना फसविले. त्यात परित्यक्ता, विधवा महिलांचा समावेश आहे. त्याचे दागिने, रोकड, घेऊन तो परागंदा झालेला असून कामोठे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या तरुणाचे वाक्चातुर्य चांगले असून त्याने महिलांबरोबरच अनेक लोकांनादेखील गंडा घातल्याचा पोलिसांचा संशय आहे.