संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : बंड करणारे किंवा बंडात सहभागी होणारे आमदार पुढील निवडणुकीत पराभूत झाल्याची उदाहरणे राज्याच्या राजकारणात आहेत. अगदी पुलोदपासून, समाजवादी काँग्रेस, छगन भुजबळ समर्थक, जनता दल, नारायण राणे समर्थकांना पराभवाचा धक्का बसला आहे. हीच परंपरा यापुढील काळातही सुरू राहते का, हे आता पुढील निवडणुकीत बघायला मिळेल.

छगन भुजबळ यांच्याबरोबर शिवसेनेतून बाहेर पडलेले बहुतांशी आमदार पुढील निवडणुकीत पराभूत झाल्याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत करून दिली. पण राज्यात जेव्हा केव्हा बंडे झाली अथवा मोठय़ा प्रमाणावर घाऊक पक्षांतरे झाली त्यानंतर यातील बहुतांशी आमदार मंडळींचा पुढील निवडणुकांमध्ये पराभव झाल्याची राज्यात उदाहरणे आहेत. बंड करणाऱ्या आमदारांना मतदार पुन्हा संधी देत नाहीत हेच त्यावरून स्पष्ट होते.

पुलोदचा प्रयोग

 १९७८ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत जनता लाटेत जनता पक्षाचे ९९, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ६९ तर इंदिरा काँग्रेसचे ६२ आमदार निवडून आले होते. दोन्ही काँग्रेसने वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. दोन्ही काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षांत सरकारमध्ये दुफळी निर्माण झाली. शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग केला. जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन केले. इंदिरा गांधी सत्तेत आल्यावर पवारांचे सरकार बरखास्त करण्यात आले. १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला १८६ जागा मिळाल्या. जनता पक्षाची सदस्यसंख्या ९९ वरून १७ वर घटली. पुलोदचा प्रयोग करताना जनता पक्षाच्या आमदारांनी बंड केले नव्हते वा पक्षांतरही केले नव्हते. फक्त शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील फुटीर गटाला पाठिंबा दिला होता. पण पुढील निवडणुकीत जनता पक्षाची वाताहत झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ६९ आमदारांपैकी निम्म्यापेक्षा अधिक आमदार पराभूत झाले होते. त्यात मातब्बरांचा समावेश होता.

समाजवादी काँग्रेस पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजेच पुलोदचा प्रयोग फसल्यावर शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेस स्थापन केली होती. १९८०च्या निवडणुकीत पवारांनी अर्स काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. तेव्हा अर्स काँग्रेसचे ४७ आमदार निवडून  आले होते. पुढे यातील ३५ च्या आसपास आमदारांनी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९८५च्या निवडणुकीत यातील बहुसंख्य आमदार पराभूत झाले. यापैकी काही आमदार तर पुन्हा कधीच विधानसभेत दिसले नाहीत, असा अनुभव शरद पवार यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.

छगन भुजबळ यांचे बंड

१९९०च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५२ आमदार निवडून आले होते. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षांतून छगन भुजबळ यांनी बंड पुकारले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात १८ जणांनी स्वतंत्र गट स्थापन केला. भुजबळ व त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत दोन- तीन अपवाद वगळता भुजबळांसह सारेच आमदार पराभूत झाले. माझगाव मतदारसंघात बाळा नांदगावकर यांनी भुजबळ यांचा पराभव केला होता.

जनता दलातील फूट 

१९९०च्या निवडणुकीत जनता दलाचे २४ आमदार निवडून आले होते. पण बबनराव पाचपुते व पक्षाच्या ११ आमदारांनी बंड केले. या आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. १९९५च्या निवडणुकीत यातील बहुसंख्य आमदार पराभूत झाले होते.

गणेश नाईक पराभूत

नवी मुंबईतील शक्तिमान नेते गणेश नाईक यांनी शिवसेनेला आव्हान देत १९९८ मध्ये स्वतंत्र संघटना स्थापन केली होती. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा झटका देण्याचा इरादा त्यांनी  व्यक्त  केला होता. पण १९९९च्या निवडणुकीत सीताराम भोईर या नवख्या कार्यकर्त्यांने नाईकांचा नवी मुंबई या त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभव केला होता.

नारायण राणे यांचे बंड 

२००५ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केले. राणे यांना शिवसेनेतील मोठय़ा प्रमाणावर आमदारांची साथ मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण शिवसेनेतील ८ ते १० आमदारांनीच राणे यांना साथ दिली होती. स्वत: राणे व कोकणातील आमदारांनी राजीनामे देऊन पोटनिवडणुका लढविल्या होत्या. राणे यांच्यासह गणपत कदम, शंकर कांबळी व सुभाष बने हे तिघे पोटनिवडणुकीत निवडून आले. पण श्रीवर्धनमध्ये शाम सावंत हे पराभूत झाले. रामटेक लोकसभा मतदारसंघात सुबोध मोहिते हे राणे समर्थक पराभूत झाले होते. २०१४ची विधानसभा निवडणूक तर २०१५ मध्ये वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत स्वत: नारायण राणे हेच पराभूत झाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics election tradition state defeating rebellious mlas ysh
First published on: 25-06-2022 at 00:02 IST