मुंबई महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वाहिन्या मंगळवारी सकाळी १० वाजून ८ मिनिटांनी बंद पडल्याने मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, नवी मुंबई, पालघरमधील वीजपुरवठा जवळपास अर्धा ते एक तास खंडित झाल्याने ऐन उन्हाळय़ात पंखे-वातानुकूल यंत्रणा बंद पडून लोकांचे हाल झाले. पडघा उपकेंद्रातील बिघाडामुळे मुंबईतील दादर-माहीम, मानखुर्द-वांद्रेपासून ते बेलापूर-खारघर ते शहापूर-मुरबाडपर्यंतच्या परिसरात म्हणजेच मुंबई शहर-उपनगर, नवी मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात या काळात २२५० ते २३५० मेगावॉटचे भारनियमन करण्यात झाले. मुंबई महानगर प्रदेशातील वीजपुरवठय़ासाठी महत्त्वाचे असलेल्या पडघा येथील महापारेषणच्या ४०० के. व्ही. अति उच्च दाब उपकेंद्रात सकाळी दहा वाजून आठ मिनिटांनी ४०० केव्हीच्या यंत्रणेत अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पडघा उपकेंद्रातील सर्व ४०० केव्ही व २२० केव्ही वाहिन्या बंद पडल्या. यामुळे मुंबई शहर व उपनगरातील वीजपुरवठा करणाऱ्या २ पारेषण वाहिन्या बंद पडल्या. तसेच २२० केव्ही टेमघर, पाल, वाडा, वसई, कोलशेत, कलरकेम, आनंदनगर, जांभूळ, पलावा तसेच १०० केव्ही भिवंडी, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड, मोहणे, पीसे, पंजरपूर, डोंबिवली या उपकेंद्रातील वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे समांतर वाहिन्यांवर भार येऊन बोईसर, बेलापूर, खारघर, वाशी या ठिकाणी ५१८ मेगावॉटचे स्वचलित भारनियमन झाले. तसेच ४०० केव्ही तळेगाव, ४०० केव्ही खारघर या वाहिन्यांवरील भार कमी करण्यासाठी मुंबई व उपनगरातील दादर, माहीम, चेंबूर, धारावी, गोवंडी, चुनाभट्टी, मानखुर्द आणि वांद्रे या भागात ४९८ मेगावॉटचे भारनियमन करण्यात आले. महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेत हळूहळू यंत्रणा पूर्ववत केली. त्यामुळे ३० ते ६० मिनिटांत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत भिवंडी, टेमघर, वसई, डोंबिवली, मुलुंड, बेलापूर, ठाणे, वाशी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड व शहापूर येथील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला, अशी माहिती महापारेषणतर्फे देण्यात आली. पडघ्यातील या बिघाडामुळे पुण्याहून येणाऱ्या पुण्यातील तळेगाव ते खारघर व खारघर ते कळवा आणि कळवा ते पडघा या वाहिन्यांवर ताण आला. त्यामुळे पुण्यातील तळेगाव भागातील दोन उपकेंद्रावरील वीजपुरवठाही काही काळ खंडित झाल्याचे ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच हा प्रकार वगळता राज्यात विजेच्या तुटवडय़ामुळे भारनियमन करण्याची वेळ मंगळवारी आली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. पडघा उपकेंद्राचे महत्त्व वीजनिर्मिती केंद्रातील वीज ग्राहकांपर्यंत पोहोचवताना आधी ती उच्चदाब पारेषण वाहिन्यांवरून पारेषण उपकेंद्रात येत असते. तेथून ती नजीकच्या भागातील वीज उपकेंद्रांमध्ये पाठवण्यात येते व तेथून वीजवितरण उपकेंद्र व वाहिन्यांद्वारे ग्राहकांना वितरित केली जाते. भिवंडीजवळ असलेल्या पडघा येथे महापारेषणचे उपकेंद्र आहे. मुंबई शहर-उपनगरासाठी बाहेरून येणारी वीज, ठाणे-पालघर जिल्ह्यासाठी वीजनिर्मिती केंद्रांवरून येणारी वीज प्रथम पडघा येथील महापारेषणच्या उपकेंद्रात उच्चदाब वाहिन्यांवरून येते. म्हणजेच मुंबई महानगरातील वीजपुरवठय़ासाठी पडघा उपकेंद्र अत्यंत महत्त्वाचे आहे. यात बिघाड झाल्यास मुंबई शहर व उपनगरासह ठाणे, पालघर जिल्ह्यातील वीजपुरवठय़ावर परिणाम होतो. पडघा उपकेंद्रातील बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची गेल्या दोन वर्षांतील ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२० मध्येही पडघा उपकेंद्रातील पारेषण यंत्रणेतील बिघाडामुळे मुंबई महानगर प्रदेश परिसर दोन दिवस अंधारात होता. त्यानंतर फेब्रुवारीतही छोटा बिघाड झाला. त्यानंतर आता मंगळवारी पुन्हा पडघ्यातील यंत्रणा बंद पडली.